पेठ : लॉकडाऊनच्या काळात करोना संदर्भात चुकीचा माहिती प्रसारीत करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान पेठ व दिंडोरी तालुक्यातील तिघांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, सध्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतांना फेसबुक खात्यावरून एकत्र जमण्याबाबत आवाहनाचा मेसेज व्हायरल केल्या प्रकरणी पेठ तालुक्यातील २ व दिंडोरी तालुक्यातील १ असे ३ युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रविंद्र बेंडकुळी (रा. आंबापाणी ता. पेठ) यांने त्याच्या फेसबुक खात्यावरून ‘आंबापाणी येथे गुरूवारी दि .२८रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत भाषण ( माहीती) देणार असून भाविक भक्तांनी आंबापाणी येथे जमावे’ आशा आशयाचा मजकूर त्याने व्हायरल केला.
सदरचा मॅसेज किसन वाघमारे व काशिनाथ महादू चारोस्कर (रा. महाजे ता . दिंडोरी) यांनी इतरांना फॉरवर्ड केल्या प्रकरणी त्यांच्या विरूध्द पो. हवा. रमेश पाटील यांचे फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एस .पी. वसावे करीत आहेत .