नाशिक । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांना दोन महिन्याचे रेशन एकावेळि दिले जाणार आहे. जिल्ह्याला एप्रिल महिन्याचे रेशन प्राप्त झाले आहे. १५ एप्रिलपर्यंत उर्वरीत राशन प्राप्त होऊन त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्याचे पुरवठा विभागाचे नियोजन आहे. दुकानदारांनी प्राप्त धान्याचे चलन भरुन त्याची उचल करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
करोना संकटामुळे १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन आहे. करोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता लाॅकडाउनचा कालावधी पुढे देखील वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका हा गोरगरिब व हातावर पोट असणार्यांना बसणार अाहे. कामधंदे बंद असल्यामुळे त्यांची उपासमार होणार आहे. ते बघता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन लाभार्थ्यांना दोन महिन्याचे रेशन अगाऊ दिले जावे असे आदेश दिले होते.
केद्र सरकारने देखील तीन महिन्याचे रेशन गोरगरिबांना दिले जावे असे आदेश दिले आहेत. त्यानूसार शासनाकडून एप्रिल महिन्याचे रेशन जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. लाभार्थ्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो दराने अंत्योदय व प्राधान्यक्रम कटुंबातील लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील दुकानदारंनी चलन भरुन धान्य उचलून त्याचे वाटप करावे अशी सूचना दुकानदारांना केली आहे. उर्वरीत दोन महिन्याचे राशन पुढील दहा दिवसात जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. १५ एप्रिल पर्यंत उर्वरीत धान्य लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.
एप्रिल महिन्याचे धान्य जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. रेशन दुकानदारांनी त्याचे वाटप करावे. १५ एप्रिलपर्यंत उर्वरीत दोन महिन्याचे राशन लाभार्थ्यांना वाटप केले जाईल.
डाॅ. अरविंद नर्सीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी