एमआयडीसीकडून सुमारे ४२५ उद्योगांना परवानगी; मनपा हद्दी बाहेरीलही उद्योजकांचा समावेश

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक : व्यापार-उद्योग सुरु होणारी या आशेने व्यापारी व उद्योजक उत्साहीत झाले होते, मात्र नाशिक महानगरपालिका हद्दी बाहेरील उद्योगांना परवानगी मिळणार असून काही निवडक व्यवसायांना सवलत देण्यात आली असल्याने अनेक उद्योजक व व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे.

दि. २० एप्रिल पासून लॉक डाऊन हटणार अशा आशयाच्या क्लिप्स सातत्याने व्हाट्सअप वर फिरत होते. त्यामुळे व्यापार व उद्योगांना सवलती मिळतील अशी आशा व्यावसायिकांमध्ये व्यक्त होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर परवान्यांसाठी एमआयडीसी अन्न व औषध प्रशासन व कामगार आयुक्तांच्या दालनाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमू लागली होती.
एमआयडीसीने दालनात कोणालाच प्रवेश नसल्याचे सांगून केवळ ऑनलाइन अर्ज करावे परवानगी शक्य असल्यास मिळेल अशा स्पष्ट सूचना दारावर लावलेले आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील नागरिक ऑनलाइनचा आधार घेताना दिसून येत आहेत.

एमआयडीसीकडून सुमारे ४२५ उद्योगांना परवानगी देण्यात आल्या यात महानगर हद्दीच्या बाहेरीलही उद्योजकांचा समावेश आहे. एमआयडीसीचे वतीने शक्यतो अन्न प्रक्रिया उद्योग, औषध निर्मिती उद्योग, पॅकेजिंग उद्योग व माहिती तंत्रज्ञान यांना मनुष्यबळाच्या मर्यादेसोबत परवानगी देण्यात आले आहेत. यासोबतच सामाजिक अंतर बाळगणे, सैनीटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क लावणे यासारखी बंधने टाकण्यात आलेली आहे. नाशिक महानगर पालिका हद्दीतील शक्यतो सरकारी व सामाजिक सेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या उद्योगांना पहिल्या टप्प्यात परवानगी देण्यात आलेली असल्याचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाकडे हॉटेल, मिठाई दुकान टपऱ्यांच्या परवानगी मागणीसाठी व्यवसायिकांनी गर्दी केली होती. प्रशासनाद्वारे याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. १७ कंटेनमेंट क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायाला परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त च्या भागासाठी किराणा दुकान, दूधडेअरी, बेकरी,फरसाण, दुग्धजन्य पदार्थ विक्री व मिठाई विक्री परवानगी दिली जाणार आहे. यासोबतच अन्न उत्पादन करणाऱ्या व त्याची किरकोळ विक्री करणाऱ्या व्यवसायांना परवानगी राहणार आहे यासोबतच मास व मच्छी व्यवसायीकानाही परवानगी दिली जाणार आहे.

यात प्रामुख्याने सामाजिक आंतर पाळणे, सुरक्षिततेचे साधने वापरणे, सातत्याने त्यांनी सँनीटायगर चा वापर करणे, तोंडावर मास्क लावणे, नागरिकांशी सुरक्षित अंतर ठेवणे, मिठाई दुकान अथवा बेकरी दूध डेअरी यांनी फक्त नागरिकांना पॅकिंग मध्ये माल विक्री करणे, तिथेच बसून खाण्याची व्यवस्था ठेवू नये अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत

या अटीशर्तींवर नाशिक शहर परिसरात मिठाई व्यवसायिक, दूध डेअरी, बेकरी, किराणा, फरसाण व्यवसायीकांना परवानगी दिली जात आहे.

केवळ सुविधाेसाठी सूट

व्यवसायिकांना प्रशासनाने परवानगी दिली, असली तरी लॉक डाऊन संपलेले नाही. शासनाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे अधीन राहूनच व्यवसाय करावा लागेल सामाजिक आंतर, मास्क, वैयक्तिक स्वच्छता ही अत्यावश्यक बाब आहे. उद्योगांनी व व्यवसायिकांनी अन्नप्रक्रियाचे स्वयंपाक घर , कमी कामगारांची नेमणूक करून सुरक्षित अंतर ठेवावे व्यवसाय करण्याचे निर्देश देण्याच आले आहेत. या सुविधांना परवानगी देणे हे केवळ सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नये. त्यांना आवश्यक सेवा जातीने मिळाव्यात यासाठी ही सवलत देण्यात आलेली आहे हे प्रत्येकाने लक्षात असू द्यावे.
चंद्रशेखर साळुंके, सह आयुक्त अन्नऔषध प्रशासन

कामगारांना त्वरित वेतन द्यावे

कारखान्यांनी नेमून दिलेल्या किमान मनुष्यबळ यांच्या आधारावर काम करावे प्रत्येक कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात वर्ग करावे लॉकडाऊन च्या काळात कामगारांची गैरहजेरी लावू नये सुरू करण्यात आलेल्या कारखान्यात कामगारांच्या सुरक्षिततेची व स्वास्थ्याची पूर्ण काळजी घेण्यात यावी.
गुलाबराव दाभाडे , कामगार उपायुक्त

परवानग्या ऑनलाइन मिळतील

शासनाने निर्देशित केलेल्या उद्योगांना परवानगी दिली जात आहे. उद्योजकांनी आपल्या उद्योगाची सविस्तर माहिती ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. त्यांना थेट ऑनलाइनवर परवानगी मिळणार आहे. उगाच कार्यालयात गर्दी करू नये तिथे संपर्क होऊ शकणार नाही.
नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *