नाशिक : लाॅकडाउन काळात रेशन कार्ड नसलेल्या इतर मध्यमवर्गीयांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ दिले जाणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातील रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. साधारणत: ही संख्या ४ ते पाच लाखांच्या घरात जाउ शकते. त्यासाठी १८ हजार मेट्रीक टन तांदळाची गरज असून जिल्हा पुरवठा विभागाकडे हा स्टाॅक उपलब्ध आहे.
देशासह महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा चौथा टप्पा सुरु अाहे. लाॅकडाऊनमध्ये गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी रेशन लाभार्थ्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्याचे रेशन अगाऊ देण्यात आले आहे. मात्र, लाॅकडाऊन वाढत असल्यामुळे रेशन कार्ड लाभार्थ्यांव्यतिरिक्त इतर गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
ते बघता रेशन कार्ड नसलेल्यांना देखील अन्नधान्य द्यावे ही मागणी केली जात होती. अखेर केंद्रिय अन्न पुरवठा मंत्री पासवान यांनी रेशन कार्ड नसलेल्यांना रेशन देण्यास मंजुरी दिली. त्या नूसार जिल्हा प्रशासनाने अन्नधान्याची गरज असलेल्या पण रेशन कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांचे तालुकानिहाय सर्वेक्षण सुरु केले आहे.
त्यासाठी तहसिलदारांना सूचन्या देण्यात आल्या असून ग्राम पंचायत, नगरपालिका, नगर पंचायत, नगरसेवक, आमदार यांच्याकडून माहिती घेतली गोळा केली जात असून त्यांची मदत घेतली जात आहे. साधारणपणे एक दीड आठवड्यात हि माहिती संकलित करुन त्यानंतर रेशन दुकानाच्या माध्यनातून तांदूळ वाटपाला सुरुवात होईल.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार लाभार्थ्यांचा आकडा चार ते पाच लाख इतका असू शकतो. रेशन कार्ड नसलेल्या परिवारांनाही तांदूळ मिळणार असल्याने त्यांना मोठा आधार मिळणार आहे.
जिल्ह्यातील रेशन लाभार्थी – ३६ लाख परिवार
रेशन दुकाने – २ हजार ६००
महिन्याला धान्य वाटप
अंत्योदय लाभार्थी
२६ किलो गहू , ९ किलो तांदूळ
अन्न सुरक्षा योजना
३ किलो गहू , २ किलो तांदूळ
केशरी कार्डधारक
३ किलो गहू , २ किलो तांदूळ
तहसिलदारांना सर्वेक्षणाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रेशन कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड प्रमाणिकरण करुन तांदूळ दिले जाईल. साधारण: ४ ते ५ लाख लाभार्थी असू शकतात. त्यांना वाटपासाठी १८०० मेट्रिक टन तांदळाच्या स्टाॅकची गरज आहे.
– डाॅ. अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
रेशन कार्ड नसलेल्यांना मोफत तांदूळ दिले जाणार अशी घोषणा शासनाने केली आहे. त्याबाबत आम्हाला गाईडलाईन्स प्राप्त नाही. आदेश प्राप्त झाल्यावर वाटपाचे काम सुरु करु. मात्र, सध्या तरी रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांनी तांदूळ घेण्यासाठी गर्दी करणे टाळावे.
– निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव रेशन दुकानदार संघटना