शिवभोजन थाळीमुळे गरीब जनतेचे आशीर्वाद मिळतील- असिमा मित्तल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवभोजन योजनेमुळे गोरगरीब जनतेला दहा रुपयांत पोटभर अन्न मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून राज्य शासनाने ही योजना सुरु केली असून शासनाच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे गरीब जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि योजना अल्पावधीत लोकप्रिय होईल. हे जेवण रुचकर आणि स्वादिष्ट असून दररोज येथे येणार्या गरीब व गरजूंना याचपद्धतीने चांगले जेवण द्यावे, अशा सूचना प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी असिमा मित्तल यांनी दिल्या.
नगरमध्ये नव्याने पाच ठिकाणी शिवभोजन केंंद्रांच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी उपस्थित होत्या. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या, महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात कोणीही भुकेले राहू नये, यासाठी राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे अवघ्या दहा रुपयांत प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी देण्याची योजना राज्य शासनाने सुरु केली.
नगरमध्ये आणखी नवीन पाच ठिकाणी हे केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ होईल असा विश्वास व्यक्त करून ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने चालविण्याची जबाबदारी चालकांवर आहे. येथील परिसर स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा उच्च प्रतिचा राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी पुरवठा निरिक्षक अधिकारी विजय उमाप, अभिजित वांढेकर, संचालिका गायत्री रमेश धायतडक आदी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी म्हणाल्या, ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणार्या गोरगरीब जनतेला केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे.
शिवभोजन थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी भात आणि एक वाटी वरण, दररोज दुपारी 12 ते 2 यावेळेत उपलब्ध होईल, असे सांगितले. यावेळी आलेल्या ग्राहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी थाळी घेणार्यांची आस्थेने चौकशी केली. शेवटी रेव्हेन्यू कॅन्टीनच्या संचालिका गायत्री धायतडक यांनी सर्वांचे आभार मानले.