कोरोेनाबाबत काळजी घ्या, घाबरून जाऊ नका – ना. थोरात

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर (प्रतिनिधी)- कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घेताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. साबणाने हात स्वच्छ धुवावे. तसेच अफवांवर विश्‍वास न ठेवता कोरोना आजाराने घाबरून जाऊ नये असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

ना. थोरात म्हणाले, जगातील विविध देशांमध्ये कोरोना आजाराचा फैलाव झाला असून देशात व राज्यात कोरोना आजाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. कोरोना हा एक संसर्गजन्य विषाणू आहे. तो लाळ किंवा संसर्गातून होतो.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावेत तसेच तोंड, नाक व डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नयेत. परकीय व्यक्तीच्या संपर्कात राहू नये. शिंकताना व खोकतांना तोंडाला रुमाल लावावा. तसेच ज्यांना खोकला, सर्दी किंवा तापाचा त्रास जाणवतो आहे असे अनेक रुग्ण असू शकतात, तो कोरोनाच असेल अशी शंका मनात ठेवू नका. मात्र ज्याला श्‍वास घेण्यास थोडा त्रास जाणवतो आहे. त्याने संबंधित जवळच्या दवाखान्यात डॉक्टरांकडे तपासून घ्यावे.

कोरोनावर प्रभावी उपाययोजना म्हणजे स्वत:ची काळजी घेणे. कोरोना हे राज्यावरील व देशावरील मोठे संकट आहे. मात्र शासनाने कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण काही अफवा पसरवू नयेत असे आवाहनही ना.थोरात यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *