मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या १२९७ वर पोहचली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. आरोग्य सुविधांकडे राज्य सरकार विशेष लक्ष देत आहे.
दरम्यान राज्यात फिव्हर क्लिनिक्स, कोरोना बाधितांसाठी विशेष हॉस्पिटल्स अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही माहिती काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत असल्याने मुंबई महानगरपालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आता घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तसंच कोरोनाची चाचणी झटपट करता यावी याकरता बीएमसी एक लाख रॅपिड किट्सची निर्मिती करणार आहे.