पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लागू झालेल्या संचारबंदीमुळे, महाराष्ट्रासह इतर राज्यांत अडकलेल्या तालुक्यातील उसतोड कामगारांना, उदरनिर्वाह, निवास व त्यांना स्वगृही परतण्याची सोय राज्य सरकारने उपलब्ध करुन देण्याची मागणी, शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना २७ मार्च रोजी पाठविलेल्या पत्रात आमदार मोनिका राजळे यांनी म्हटले आहे की माझ्या शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून दरवर्षी तीस ते चाळीस हजार उसतोड कामगार, महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेशातील साखर कारखान्यांवर स्थलांतरित होतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली आहे.
अशा परिस्थितीत, पाथर्डी, शेवगांव, शिरुर कासार, आष्टी या अहमदनगर व बीड जिल्ह्यांतील तालुक्यांतून उसतोडणीसाठी गेलेले उसतोड कामगार, महाराष्ट्रासह इतर राज्यांत अडकून पडले आहेत. काही साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाल्याने काही कामगार आपापल्या गावी परतले आहेत. काही परतण्याच्या वाटेवर होते. तर काही साखर कारखाने अद्यापही सुरुच असल्याने, कित्येक कामगार कारखाना परिसर व उसाच्या फडांवर अडकून पडले आहेत.