Thursday, April 25, 2024
Homeनगरनागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- ना. थोरात

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- ना. थोरात

ना. थोरातांनी संगमनेरात घेतला करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

संगमनेर (प्रतिनिधी)- करोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी ही अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे.तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे असे अवाहन ना. थोरात यांनी केले आहे. संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

- Advertisement -

अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक झाली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनिल पाटील, पी. वाय. कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदि उपस्थित होते.

यावेळी ना. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच धांदरफळ बु.,कुरण,घुलेवाडी येथील परिस्थिती व उपाययोजनांबाबद आढावा यांसह शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला सूचना केल्या. याप्रसंगी ना. थोरात म्हणाले, करोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र आता नागरिकांनी शासनाच्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. करोनाचा मुकाबला आपण सतर्क राहुन करु या. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देवून काही कडक नियम केले आहेत.

आपण त्यांना सहकार्य करा. करोना संकटात महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचारी सह अनेक विभागांचे कर्मचारी व स्वयंसेवक चांगले काम करत आहेत. या काळात तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टंस पाळत गरिब, रोजंदारील मजूर व परप्रांतीय कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे काम कौतूकास्पद आहे. आपण राज्यपातळीवर काम करतांना काँग्रेस पक्षाच्या मदत कक्षातून परप्रांतीय मजूर,गोरगरिब यांसाठी सातत्याने काम करत असून दररोज जिल्हानिहाय आढावा घेत आहे.

अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील परिस्थिती नागरिकांच्या प्रशासनाला मिळालेल्या सहकार्यातून नियंत्रणात आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. आ. डॉ. तांबे म्हणाले, करोना संकटात अनेक शासकीय विभागांचे कर्मचारी सेवा देत आहेत. या सर्वांना आरोग्य विम्याबाबद प्रशासनानी अधिक काळजी घ्यावी.तसेच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. पावसाळयाच्या सुरुवातीला दरवर्षी प्रमाणे सर्दी, ताप, खोकला ही साथ येवू शकते. यामुळे घाबरुन न जाता आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, ग्रामीण भागात नागरिकांनी मोठी काळजी घेतली आहे. शहरात अनेक स्वयंसेवक गोरगरिबांना अन्न पाकिट पुरविण्याचे काम करत आहेत. भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा ऑनलाईन मागणी द्वारे पुरविले जात आहे. सध्याच्या काळात ही करोनाची साखळी तोडण्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे असे ही त्या म्हणाल्या.

यावेळी प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी करोनाचे रुग्ण, तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती त्यांच्या सुविधा याबरोबर करोना प्रतिबांधत्मक उपाययोजनांची माहिती दिली. तर तहसीलदार अमोल निकम यांनी परप्रांतीय मजूर व सद्य परिस्थिती याबाबद माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या