Wednesday, April 24, 2024
Homeनगरउद्योग खाते मिळावे ही अपेक्षा

उद्योग खाते मिळावे ही अपेक्षा

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे : जिल्हा विभाजन व्हावे, मात्र विकासाला प्राधान्य

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यमंत्री म्हणून कोणते खाते मिळणार, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पूर्ण करू. मात्र, उद्योग खाते मिळावे, अशी मागणी केलेली असून त्या माध्यमातून जिल्ह्यात जास्तीजास्त रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, नगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असलो तरी विकासाला प्राधन्य राहणार असून महसूलमंत्रीपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे असून तेच विभाजनाच्या प्रश्नात लक्ष घालतील, असे ना. तनपुरे म्हणाले.

राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी राज्यमंत्री तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तनपुरे म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले आहेत. मंत्रीपद मिळावे, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते़. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मात्र कुणीही नाराज नाही. आम्ही निवडून आलेल्या आमदारांमध्ये चांगला सुसंवाद असून मंत्रिपदाच्या माध्यमातून तिनही पक्षांच्या समान कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य देणार आहे़.

यामध्ये निळवंडे धरणाचे कालवे, वांबोरी चारी, रस्ते, पाणी योजना आदी रखडलेल्या कामांना गती देण्यात येईल. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिने जिल्ह्याला तातडीने पोलीस अधीक्षक मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. लवकरच अधीक्षकांची नियुक्ती होईल़ लष्कराच्या के़के़ रेंज येथील जमिनीबाबत शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही, यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे प्रश्न मांडणार असल्याचे सांगून ना. तनपुरे म्हणाले़, राज्य सरकारची शिवभोजन योजना यशस्वी होईल.

यात काही त्रुटी राहिल्या तर त्यात पुढील काळात सुधारणा करता येतील. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात निवडून आलेल्या तरुण आमदारांकडून हजारे यांना चांगल्या कामाची अपेक्षा आहे.

‘त्यांना’ विकास करता आला नाही
राहुरीच्या माजी आमदाराला तालुक्याचा विकास करता आला नाही. शहरातील ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, रस्ते, पाणी आदी प्रश्न प्रलंबित आहेत. राहुरीच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणार्‍या एसटी डेपोचा प्रश्न सोडविण्यासोबत वांबोरी चारीच्या वीजबिल आणि देखभाल दुरूस्तीसाठी दोन कोटींचा निधी आणला आहे. येणार्‍या काळात सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे उद्दीष्ट असल्याचे राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या