Friday, April 26, 2024
Homeनगरकर्जमाफीसाठी 511 कोटींचा निधी प्राप्त

कर्जमाफीसाठी 511 कोटींचा निधी प्राप्त

86 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर होणार जमा : पावणे दोन लाख कर्ज खात्यांचे आधार प्रामाणिकरण पूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाविकास आघडी सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या कर्जमाफीत नगर जिल्ह्यात मंगळवारीअखेर 511 कोटींचा निधी जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आहे. हा निधी येत्या दोन दिवसांत बँकेच्या 85 हजार 579 शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. दरम्यान काल रात्रीपर्यंत जिल्ह्यात पात्र 1 लाख 75 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात महाविकास आघाडीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीत 2 लाख 58 हजार शेतकरी पात्र आहेत. या शेतकर्‍यांना 2 हजार 296 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे प्रमाणिकरण करण्यात येत आहे. प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या खात्यांची नावे पुढे सरकत असून त्यानूसार बँकेच्या खात्यावर सरकारच्या आयटी विभागाकडून कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सोमवारपासून जिल्हा बँकेच्या खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग करण्यात येत आहे. यात सोमवारी 10 हजार 176 शेतकर्‍यांसाठी 69 कोटी रुपयांची कर्जाची रक्कम जमा करण्यात आली होती. तर काल मंगळवारी 75 हजार 403 शेतकर्‍यांसाठी 442 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत संबंधीत कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा केल्यावर त्याला एसएमएसव्दारे कर्जमुक्त झाल्याचे सुचित करण्यात येणार आहे.

दुसरीकडे पात्र शेतकर्‍यांच्या आधार प्रामाणिकरणाची प्रक्रिया जोरात असून असून मंगळवार अखेर 1 लाख 75 हजार शेतकर्‍यांचे आधार प्रामाणिकरण झाले होते. येत्या दोन दिवसांत हे काम देखील पूर्ण होणार आहे.

तहसीलदारांकडे 794 तक्रारी
कर्जमाफीस पात्र असणार्‍या 794 शेतकर्‍यांच्या हातांचे ठसे उमटत नसल्याने आधार प्रमाणिकरण होत नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील 14 तहसीलदारांकडे प्राप्त आहेत. यातील 178 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी हातांच्या ठशाव्दारे आधार प्रमाणिकरण होत नाही, अशा ठिकाणी तहसीलदार समक्ष पाहणी करून संबंधीत शेतकर्‍यांचे प्रमाणिकरण करणार आहेत. जिल्हास्तरावर असणार्‍या समितीकडे 858 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे निवारण करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या