Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रगर्दी टाळण्यासाठी मद्य विक्रीसाठी आता टोकन पद्धत

गर्दी टाळण्यासाठी मद्य विक्रीसाठी आता टोकन पद्धत

मुंबई – १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर राज्य सरकारनं जीवनावश्यक नसलेल्या पण महसूलाच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली मद्य विक्रीची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, पहिल्याच दिवशी नागरिकांनी मद्य विक्रीच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं ही गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला होता. त्यावरही सरकारनं मार्ग काढला असून, आता टोकन पद्धतीनं राज्यात मद्य विक्री केली जाणार आहे. त्यासाठीची नियमावली राज्य उत्पादन शुल्क विभागानं जारी केली आहे.

3 मे नंतर लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. त्याचबरोबर या काळात जीवनावश्यक आणि जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकानं उघडण्यास शिथिलता देण्यात आली होती. राज्य सरकारनंही यासंदर्भात रविवारी आदेश जारी केले होते. त्यात मद्य विक्रीसह इतर जीवनावश्यक नसलेल्या एकल दुकानांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मद्य विक्रीच्या दुकानांसमोर जास्त गर्दी होत असल्याचं पहिल्याच दिवशी दिसून आलं. त्यामुळे सरकारनं ही गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती आणण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

अशी असेल दारू विक्रीची टोकन पद्धती
मद्यविक्री दुकानासमोर ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी मार्किंग करण्यात यावं. त्यामध्ये किमान 6 फुटाचं अंतर असावं. मद्य विक्री सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना मार्किंगमध्ये उभं राहण्याच्या सूचना द्याव्यात. रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म द्यावा, ज्यामध्ये ग्राहकांचा नंबर, त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि मद्याच्या मागणीची माहिती (ब्रँडचं नाव व किती मागणी) असावी. ग्राहकांना हा फॉर्म दिल्यानंतर टोकन क्रमांक देण्यात यावा. टोकन उपलब्ध नसल्यास कोर्‍या कागदावर दुकानाचा शिक्का आणि मोबाईल नंबर देऊन टोकन क्रमांक लिहावा. अशा पद्धतीनं एका तासात 50 ग्राहकांना सेवा देता येईल. त्यानंतर दुसर्‍या तासात 51 ते 100 असे क्रमांक घेण्यात यावे. अशाप्रकारे 8 तासांत 400 लोकांना मद्य विक्री केली जाऊ शकते. उर्वरित लोकांना दुसर्‍या दिवशी येण्यास सांगावं. यामुळे गर्दी नियंत्रित करता येईल.हे सर्व करताना सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं काटेकोटरपणे पालन करण्यात यावं. यासाठी मद्य विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. त्याचबरोबर राज्याच्या प्रत्येक विभागातील जवान, सहायक दुय्यम निरीक्षकांनी सोशल डिस्टन्ंिसग आणि गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी, असं विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आलं आहे. गर्दी होणार्‍या विशिष्ट भागातील पाहणीसाठी भरारी पथक नेमण्यात यावं. त्याचबरोबर उप विभागीय आयुक्त आणि अधीक्षकांनीही मद्य विक्रीच्या दुकानांसमोरील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिले आहेत. 

- Advertisment -

ताज्या बातम्या