अन म्हणून डॉ. अमोल कोल्हे झाले भावुक…

अन म्हणून डॉ. अमोल कोल्हे झाले भावुक…

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय.

दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता लवकरच निरोप घेणार असल्याने अमोल कोल्हे भावूक झाले. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. समाधान..हुरहूर…आनंद..व्याकुळता…निर्माण होणारी एक अनामिक पोकळी आणि तरीही व्यापून उरणारं बरंच काही..अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या.

‘सुरु झालेला प्रवास कधी ना कधी संपणार हे निश्चितच असतं. काही प्रवास खूप काही शिकवून जातात. कर्तव्यपूर्तीची अनुभूती देतात, स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात, जणूकाही आयुष्यभराची शिदोरी देतात. असाच एक प्रवास, काळजाच्या कप्प्यात जपून ठेवण्याजोगा…छत्रपती संभाजी महाराजांची अंगारगाथा.. स्वराज्यरक्षक संभाजी’, असे उद्गार या व्हिडीओत ऐकायला मिळतात.

हा व्हिडीओ पाहून डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत या मालिकेचे चाहते देखील नक्कीच भावुक झाले असतील यात शंकाच नाही. झी मराठी वाहिनीवरील ही अत्यंत लोकप्रिय मालिका फेब्रुवारी महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com