Thursday, April 25, 2024
Homeनगरअवैध वाळूधंद्यात राजकीय नेते, महसूल व पोलिसांची हातमिळवणी – शेलार

अवैध वाळूधंद्यात राजकीय नेते, महसूल व पोलिसांची हातमिळवणी – शेलार

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील घोड, भीमा, हंगा नद्यांच्या बरोबर सर्वच लहान मोठ्या ओढ्यात वाळूची तस्करी होत असल्याची तक्रार आमदार बबनराव पाचपुते यांनी केली; मात्र याला पाठबळ आणि या धंद्यात कंट्रोल कुणाचे होते हे पाचपुतेंना माहीत आहे. एस. पी. नावाचे अवैध वाळू काढण्यासाठीचे वाहने कुणाचे आहे असा सवाल करत पाचपुतेंची अवैध वाळू धंदा थांबवण्यासाठी तळमळ नाही. राजकीय नेते, महसूल अधिकारी आणि पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांचे काही अधिकारी, कर्मचारी यांचीच हातमिळवणी आहे. यातून तालुक्यातील पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचे प्रतिपादन राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार पत्रकार परिषदेत केले.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौर्‍यात केलेल्या अवैध वाळूच्या तस्करीबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने भाष्य केले. यात अनेक वर्षे पाचपुते यांचाच कंट्रोल या धंद्यात असल्याचे म्हटले. एस. पी. लिहलेले वाहने कुणाच्या इशार्‍याने घोड नदीत वाळू काढत आहेत. पाचपुते यांच्या समूळ वाळूचा अवैध धंदे बंद करण्याचा मागणीला आपला पाठिंबा आहे; मात्र त्यानी त्यावर ठाम राहवे.

- Advertisement -

तालुक्यातील घोड आणि भीमा नदीच्या पात्रातून वाळूतस्करी होत आहे. यावर कारवाई होत नाही. पर्यावरणाचा विषय आल्याने वाळूचे लिलाव होत नाहीत. मात्र रोज शेकडो ट्रक वाळू निघत आहे. याला काही राजकीय नेत्यांच्या पाठिंबा असल्याने महसूलचे अधिकारी कारवाई टाळत आहेत.पोलीस कारवाईचाही अनेक वेळा संशय येत असतो स्थानिक गुन्हे शाखेचे जे पथक कारवाई साठी येते, त्यातील काहींचा थेट संबंध वाळूच्या धंद्यात असल्याने तालुक्यातील पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचे शेलार म्हणाले.

आपण याबाबत आवाज उठवणार असून याबाबत तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी श्रीगोंदा कारखाना उपाध्यक्ष केशवराव मगर, कैलासराव पाचपुते, जिजाबापू शिंदें, दीपक भोसले आदी उपस्थित होते.

वाळूच्या धंद्यात नागवडे, पाचपुते यांची जुनीच युती – भोसले
या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी काष्टी, वांगदरी हद्दीत घोड पात्रात वाळूचा उपसा करून 30-40 फूट खड्डे तयार झाले असल्याचे म्हटले. भविष्यात असेच चालू राहिले तर आमचे शेत वाहून जाईलच; शिवाय नदीचा प्रवाह बदलेल अशी चिंता व्यक्त केली. या धंद्यात पाचपुते व नागवडे यांची जुनी युती असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या