Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोरोना : शहरांपेक्षा ग्रामीण नागरिक जास्त ‘सजग’

कोरोना : शहरांपेक्षा ग्रामीण नागरिक जास्त ‘सजग’

होम क्वारंटाईनवर शेजारचेच लोक ठेवतात बारीक लक्ष; स्थानिक प्रशासनास मदत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जास्त सजग व संवेदनशील असल्याची प्रचिती सध्या अधिकार्‍यांना येत आहे. स्वतः सोशल डिस्टनसिंग ठेवतातच शिवाय घरात विलग (होम क्वारंटाईन) करण्यात आलेल्यांच्या हालचालीवर शेजारचे ग्रामस्थ बारीक लक्ष ठेवत आहेत. काही चुकीची गोष्ट वाढल्यास ग्रामसेवक अथवा अधिकार्‍यांना माहिती दिली जात असल्याने अधिकार्‍यांच्या कामास मदत होत आहे.

- Advertisement -

कोरोनाने सर्व जगाला विळखा घातला आहे. प्रशासन अगदी हात जोडून सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहेत. तरीही शहरी भागातील अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये नोकरीनिमित्त गेलेले अनेकजण कुटुंबासह तालुक्यात परतले आहेत. प्रशासनाने वेळीच दाखल घेत जवळजवळ सर्वांनाच घरात विलग केले आहे. त्यांच्या हातावर तसा शिकही मारण्यात आला आहे. यातील कुणालाही अद्याप कोरोनाचे लागण नसली तरी केवळ शहरातून आले असल्याने ही खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वसंत जमदाडे यांनी दिली.

गाव छोटे असल्याने सर्वांनाच होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची माहिती होते. पर्यायाने ती व्यक्ती घराबाहेर निघाल्यास ग्रामस्थ त्वरित ग्रामसेवक किंवा इतर अधिकार्‍यांना माहिती देतात. त्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांनाही आशा लोकांवर वेगळी निगराणी ठेवण्याचा तरा कमी होत आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून प्रत्येक गावात यासाठी ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. सरपंच समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक व सदस्य समितीचे सदस्य आहेत. समितीमार्फत गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून सरपंचाच्या परवानगीशिवाय कोणासही गावात प्रवेश दिला जात नाही. गावात निर्जंतुकीकरणाची कामे झपाट्याने सुरू असून जनजागरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली.

सर्वाधिक होम क्वारंटाईन ग्रामीण भागात
विदेशातून तसेच मोठ्या शहरांमधून परतलेल्या तालुक्यातील सुमारे दोन हजाराहून अधिकांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील बहुसंख्य हे ग्रामीण भागातील आहेत. काळजी करण्याची आवश्यकता नसून त्यांना केवळ खबरदारी म्हणून विलग करण्यात आले आहे. मातीशी जवळीक असलेले ग्रामीण भागातील लोक अति संवेदनशील असून शेतीच्या कामांमुळे अनेक जण शेतातच असतात. त्यामुळे शहरातील रिकाम टेकड्यांवर करावी लागत असलेली ‘प्रसाद वाटपाची’ कारवाई ग्रामीण भागत करावी लागत नाही. हे चांगले चित्र असून त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या