अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागातून संचलन केले. कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. पोलिसांच्या कामगिरी बद्दल नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला.
कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी बुधवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली, तोफखाना, भिंगार पोलीस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, क्यूआरटी, आरसीपी, एसआरपीएफ पथक संचलनामध्ये सहभागी झाले होते.
झेंडी गेटपासून पोलीस संचलन सुरू झाले. झेंडी गेट, रामचंद्र खुंट, हातमपूरा, पंचपीर चावडी, माळीवाडा, सर्जेपुरा, चौपटी कारंजा मार्गे हाप्पू हाती चौक यानंतर मुकुंदनगरमध्ये पोलीस संचलन करण्यात आले. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, भाजी, किराणा खरेदीसाठी वाहनांचा वापर न करता पायी चालत जाऊन जवळपास खरेदी करा, क्वारंटाईन व्यक्तींनी घरात थांबा अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.