*टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा,
*चालकांना मन:स्ताप
नाशिक । प्रतिनिधी
केंद्र सरकारचा ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना आज रविवारी टोलनाक्यांवर अंमलात आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. जिल्ह्यातही अनेक टोलनाक्यांवर माहिती अभावी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. काही ठिकाणी फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाला. पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासात फास्टॅग योजनेचा पूर्णत: फज्जा उडाला. देशभरातील ही परिस्थिती लक्षात घेता फास्टॅगचा निर्णय काही तासातच गुंडाळण्यात आला. आता नववर्षापासून ही योजना लागू केली जाणार आहे.
टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणार्या टोलनाक्यांवर फास्टॅगची योजना लागू होणार होती.मात्र, नियोजनाअभावी या योजनेच्या अंमलबजावणीला वारंवार मुदतवाढ दिली जात होती. अखेर रविवारी ही योजना सकाळी आठवेजापसून अंमलात आणली गेली. मात्र, वाहनधारकांना त्याचा ताप अधिक झाला.टोल नाका व्यवस्थापनाकडून वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. वाहन चालकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबचलांब रागां लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहनचालक व टोल कर्मचारी यांच्यात वादही झाले. टोलनाक्यांवरील एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा सुरु होती. इतर मार्गिकांवर फास्टॅग गरजेचा होता. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाला होता. फास्टॅग मिळवण्यासाठी वाहनचालकांच्या रांगा लागल्यां होत्या. एकूणच या निर्णयामुळे टोल नाक्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या मदत व तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात होती. योजनेचा उडालेला फज्जा बघता केंद्रानं फास्टॅग लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. योजनेला एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवाशाला हदयविकाराचा झटका
मुंबई-नाशिक महामार्गवरील घोटी टोलनाक्यावर दोन्ही बाजूच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईकडे खाजगी वाहनाने जाणार्या प्रवाशास हृदय विकाराचा झटका आला, पोलीसांच्या सतर्कतेने सदर प्रवाशाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी टोल प्रशासनाची रुग्ण वाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. यासह पिंपळगाव बसंवत, शिंदे-पळसेजवळील नाशिक-पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगमुळे वाहतुकीचा प्रचंड गाेंंधळ उडला. वाहनचालक अनगोंदी कारभारामुळे त्रस्त झाले.