विंचुर :
येथील स्टेट बॅंकेचे एटीएम सकाळी सव्वासहा ते साडेसहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडुन चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशेची रोकड घेवुन पसार झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील येवला रस्त्यावरील स्टेट बॅंकेचे एटीएम आज ता. 04 मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता ग्राहक पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएमची चोरी झाल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास आले असल्याने ग्राहकाने बॅकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्नील सोनजे यांच्याशी संपर्क साधुन चोरीची माहिती दिली. त्यानंतर शाखा व्यवस्थापक स्वप्नील सोनजे यांनी लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन चोरीची माहिती दिली.
त्यानंतर माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी घटनास्थळी भेट दिली असता एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळ्या रंगाचा शिडकाव करत कॅमेरा काळा केला. त्यानंतर चोरट्यांनी एटीएम कक्षात शिरकाव करत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडुन चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशे ची रोकड घेवुन पोबारा केला. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या. चोरीच्या तपासासाठी पोलीसांचे तीन पथके तयार करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक लाड, हवा. योगेश शिंदे, राजेंद्र घुगे आदी करीत आहे.
एटीएममधले वाचले 12 लाख
बॅंकेने काल ता. 03 रोजी 30 लाख एटीएम मध्ये भरले होते. त्यापैकी ग्राहकांनी 13 लाख 24 हजार पाचशे रुपये काढले होते. उर्वरित 16 लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांपैकी चोरट्यांनी चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांवर डल्ला मारला.सुदैवाने एटीएम पेटीमध्ये 12 लाखाचा कप्पा चोरट्यांना फोडता न आल्याने बॅंकेचे 12 लाख रुपये वाचले.
या अगोदरही एटीएमवर चोरट्यांनी दोन वेळा डल्ला मारला होता. मात्र स्टेट बँकेने त्यानंतरही सुरक्षितेचे दृष्टिकोनातून उपाय योजना केल्या नाही. सीसीटीव्ही असूनही त्याचा उपयोग नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एटीएम वर सुरक्षारक्षक नेमावा यासाठी नागरिकांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे तोंडी मागणी केली. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यात व्यवस्थित रेकॉर्डिंग झाले नसल्याचे स्पष्ट झाल्याने चोरट्यांचे चेहरे कॅमेरात कैद झाले नाही.