Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअब्दुल सत्तार यांचे राजीनामा नाटय

अब्दुल सत्तार यांचे राजीनामा नाटय

औरंगाबाद – काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी सकाळी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त होते. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत होतं.
मात्र शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं.

मात्र अब्दुल सत्तार हे सकाळपासून औरंगाबादेतील हॉटेलमध्ये होते. त्यांनी स्वत: याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे दिवसभर अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्याच वृत्ताने राज्याचं राजकारण ढवळून निघालं. अखेर अब्दुल सत्तार हे 8 तास 45 मिनिटांनी हॉटेल बाहेर आले आणि त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं. अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं, शिवाय ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना विचारा असं ते चंद्रकांत खरैंना उद्देशून म्हणाले.

- Advertisement -

मी पत्रकारांच्या एकेक प्रश्नाचे उत्तर देईन. मी मुख्यमंत्र्यांशी सर्व चर्चा करेन त्यानंतर यावर उत्तर देईन. पण मी आज तुम्हाला उत्तर देणार नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यावर उत्तर देईन. ज्यांनी राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना जाऊन विचारा. माझा कंट्रोल मातोश्रीवर आहे. मी आज मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे. मी राजीनामा दिला की नाही हे ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना विचारा, असं ते म्हणाले.

आज माझी एकच विनंती आहे की कोणीही माझ्याबद्दल काय बोललं, काय नाही बोललं याची पूर्ण तंतोतंत माहिती उद्धव ठाकरेंकडे दिली जाईल. माझी काय भूमिका आहे हे मी त्यांच्यासमोर मांडेन. त्यानंतर तो जो निर्णय घेतील हा सर्वांना मान्य राहिलं किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. पण मला आज कोणत्याही या प्रश्नावर उत्तर द्यायचे नाही. मी वेळ आल्यानतंर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देईन. मी मुंबईला जाणार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंशी चर्चा करेन आणि तुम्हाला सांगेन. असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

दरम्यान, सत्तार यांचा राजीनामा शिवसेनेकडे आलेला नव्हता. सत्तार ज्या नेत्यांकडे राजीनामा दिला असं सांगत आहेत त्यांच्याकडे राजीनामा आलेला नाही, असं सांगितलं जात होतं.

सत्तारांना मातोश्रीची पायरी चढण्याचाही अधिकार नाही – खैरे

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानं शिवसेनेचा नेता म्हणून मी त्यांना समजावण्यासाठी गेलो होतो. मात्र, ते आमच्यासमोर शिवसेनेबद्दल वेडंवाकडं बोलले. तुमच्या शिवसेनेचं जिल्हा परिषदेत आहेच काय?, मी राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला आहे, असं ते म्हणाले. असे शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. अशा माणसाला शिवसेनेत राहण्याचा अधिकार नाही. संपूर्ण प्रकरणाबाबत मी पक्षप्रमुखांसोबत बोलणार आहे. आम्ही वर्षानुवर्षं कष्ट घेऊन इथं संघटना वाढवली. हा कोण टिकोजीराव आम्हाला शिकवणार? असले गद्दार पक्षात घेऊन काय फायदा? डोणगावकर यांनाही पक्षानं असंच घेतलं. त्यांना पदं दिली आणि त्या निघून गेल्या. आता या सत्तारांनाही भाजपमध्येच जाऊ द्या, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. अब्दुल सत्तार यांच्याशी पक्षप्रमुखांनी चर्चा वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. त्यांना मातोश्रीची पायरी चढण्याचाही अधिकार नाही, असं खैरे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या