नगर : आठ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, एकाला स्वाईन फ्ल्यू

jalgaon-digital
4 Min Read

जिल्हाधिकारी द्विवेदी : 9 व्यक्तींचा अहवाल येणे बाकी

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्हा सरकारी रुग्णालयाने दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या 15 आणि रविवारी आणखी दोन व्यक्तींच्या पाठविलेल्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी आठ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे आठ व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असून अजून नऊ व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे.

दरम्यान, अहवाल प्राप्त आठ व्यक्तींपैकी एकाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान यापूर्वी आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे आणि त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने सोमवारी आणखी दोघांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहेत. दरम्यान, यापूर्वी बाधित सात देशांशिवाय दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका येथून आलेल्या नागरिकांचीही तपासणी केली जाणार आहे. त्यांना जिल्हा रुग्णालय येथे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, तर इतर

देशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने हा धोका लवकर संपवू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत गर्दीत जाणे टाळावेस असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात पुण्याहून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महानगरपालिका आयुक्त एस.एन. मयाकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हर परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यावेळी उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले, जे सध्या आठ जणांचे नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते निगेटीव आहेत. त्यातील चार व्यक्ती या हाय रिस्कमधील होत्या. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

शहराजवळी शाळा, महाविद्यालय बंद
यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत तशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मंगल कार्यालयांनाही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे ते म्हणाले. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, तंत्र प्रशाला, निवासी वसतीगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, कोणतेही खासगी क्लासेसही या काळात सुरु राहणार नाहीत. तसे करणार्‍यावर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासगी क्लास बंद ठेवण्याचे निर्देश
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शहरी भागातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, शहरी भागात काही ठिकाणी खासगी शाळा आणि क्लासेस सुरू आहेत. हे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काढले आहे. अन्यथा संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

13 व्यक्ती निगराणीखाली
जिल्हा रुग्णालय आणि बुथ हॉस्पिटल याठिकाणी अजूनही 13 व्यक्ती आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत. यासह निगेटिव्ह अहवाल आलेल्या त्या 8 व्यक्तींना घरी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. निगराणीखाली असणार्‍या व्यक्तीसाठी महिला आणि पुरूष असे स्वतंत्र विभाग करण्यात आले असून त्याठिकाणी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी स्पष्ट केले.

पोलीस दादा ठेवणार पाळत
संशयित कोरोनाग्रस्तांना घरीच वेगळ्या देररेखीखाली ठेवले जाणार आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांच्यावर आरोग्य विभाग आणि पोलीस अंमलदारामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे, जेणेकरून त्यांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, तसेच इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे न केल्यास संबंधित नागरिकांना जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला. घरीच देखरेखीखाली ठेवलेल्या नागरिकांच्या हातावर तशाप्रकारे नोंद केली जाईल, जेणेकरून त्यांना आपण इतरांच्या संपर्कात यायचे नाही, याबाबत जागरुकता येईल, असे त्यांनी सांगितले.

तर विनावापर असणार्‍या इमारती ताब्यात घेणार
गरज वाटल्यास शहरातील विनावापर असणार्‍या इमारती या संशयितांना निगराणीसाठी ठेवण्यासाठी ताब्यात घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नगरमधील डॉ. दीपक यांच्या जुन्या हॉस्पिटलची रिकामी इमारत त्यांनी यासाठी देऊ केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *