नंदुरबार| प्रतिनिधी- nandurbar
जिल्हा परीषद परिसरात शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परीषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी याच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, अश्विनी ठाकूर, शिक्षणाधिकारी राहूल चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती वळवी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेली रयतेचे राज्य ही संकल्पना लोकशाही व्यवस्थेला मार्गदर्शक आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक माणूस मुक्त आणि निर्भय असावा,
प्रत्येकाचा सन्मान व्हावा हे महाराजांचे विचार पुढे नेण्याची गरज आहे. महिला सन्मान व्हावा यासाठी शिवाजी महाराजांनी कठोर निर्णय घेतले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन समाजात महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.गावडे म्हणाले, स्वराज्यनिर्मितीसाठी शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले. त्यांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. या कार्याला इतिहासात तोड नाही. त्यांनी जनतेच्या हिताचे संवर्धन करण्यासोबत आवश्यक सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. त्यांनी महिलांचा सन्मान केला. त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरक आहे.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताने झाली.