नंदुरबार । प्रतिनिधी- Nandurbar
तालुक्यातील आराळे येथे ऊसाचे पाचट जाळत असतांना अचानक आगीचा भडका उडाल्यामुळे लगतच्या शेतांमधील सुमारे 20 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे.
यात सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग सुरु असतांना जेसीबीने खड्डा करण्यात आला अन्यथा आणखी लाखो रुपयांचा ऊस जळून खाक होण्याची शक्यता होती.
तालुक्यातील आराळे येथे आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका शेतकर्याने आपल्या शेतातील ऊसाची पाचट जाळली. मात्र दुपारी हवा जोरात असल्यामुळे जळालेली पाचट उडून लगतच्या ऊसाच्या शेतांमध्ये गेल्याने तोडणीवर आलेल्या ऊसाने पेट घेतला.
आगीने तासाभरात रौद्ररुप धारण करत तब्बल 21 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये सहा शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. यात अनिल रघुनाथ गिरासे यांचा 6 एकर, जयदिप भगवान राजपूत यांचा सुमारे 3 एकर, भाईदास नारायण रामराजे यांचा 3 एकर, योगेंद्र प्रतापसिंग जमादार यांचा 4 एकर, नंदु पूना जाधव यांचा दीड एकर तर संतोष जाधव यांचा 3 एकर क्षेत्रातील जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
आग विझविण्यासाठी संपुर्ण गावाने प्रयत्न केले मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. पुढील 30 एकर क्षेत्रातील ऊसाचे नुकसान होवू नये यासाठी लगतच्या शेतामध्ये जेसीबी व रोटावेटरने खड्डा करण्यात आला. यामुळे ऊस व आगीचा संपर्क तुटल्याने पुढील नुकसान टळले.