
नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव आणि अक्कलकुवा (Dhadgaon and Akkalkuwa) तालुक्यात संततधार पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनने या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन त्वरीत पंचनामेत करावेत व शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा कॉंग्रेसतर्फे (Congress) जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आदिवासी विकास मंत्री आ.ॲड.के.सी.पाडवी (mla Adv.K.C.Padvi) यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ.ऍड.के.सी.पाडवी यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागात मका हे शेतकर्यांचे मुख्य पीक असून संततधार पावसामुळे मका पीक लालसर पडून त्याची वाढ खुंटली आहे.
त्यामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला असून कृषी विभागाच्या वतीने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आ.ऍड.के.सी.पाडवी यांनी केली आहे.
या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा यासंदर्भातील सर्व माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवावी, यासाठी माजी मंत्री के.सी.पाडवी यांनी पाठपुरावा सुरू केला. जिल्हा प्रशासनाला या संदर्भाचे निवेदन देण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात या भागातील परिस्थिती अवगत करण्यात येणार आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकारने पुढे यावे अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.