शॉर्ट सर्कीटमुळे शेतात लागली आग

पाच एकर ऊस जळून खाक
शॉर्ट सर्कीटमुळे शेतात लागली आग

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

तळोदा (Taloda) येथील वनमाला विनोद सूर्यवंशी यांच्या मालकीच्या आग्यावड शिवारातील साडे तीन एकरात लावलेला व अंजनाबाई रमेश टवाळे यांच्या मालकीच्या दीड एकरात लावलेला असा एकूण पाच एकर ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतात शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक (Sugarcane crop on fire) झाल्याची घटना आज दि.२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे वनमाला विनोद सुर्यवंशी यांचे आग्यावड शिवारातील ( गट क्रमांक ३२१) शेतात साडे तीन एकरात व त्याच शेजारी दीड एकरात अंजनाबाई रमेश टवाळे या दोन्ही महिला शेतकर्‍यांनी ऊस लागवड केली होती.

आज दि.२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे संपूर्ण साडेतीन एकर ऊस हा जळून खाक झाला. त्यात अंदाजे २५० टन ऊस जळाला आहे. अस्मानी संकटांबरोबरच महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झाले आहे. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत.

मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते. अशाचप्रकारे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना तळोदा तालुक्यात होत आहेत. दुष्काळात पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक एन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दुष्काळ सदृश परिस्थितीसमोर असताना या ओढवलेल्या संकटांमुळे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍याकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com