जळगाव - Jalgaon
‘गुलाब’ चक्रीवादळाच्या अनुषंगाने प्रादेशिक मौसम केंद्र, कुलाबा मुंबई यांचेकडून दिलेल्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात दि.२६ ते ३० सप्टेंबर या कालाधीत नाशिक विभागातील जळगावसह काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. याअनुषंगाने सर्व यंत्रणांना याबाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: नदी, धरणे, तलाव असलेल्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनी खबरदारी घेऊन कुठल्याही प्रकारची आपत्ती घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी तसेच नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये, वाहने, पशुधन इ. सुरक्षितस्थळी ठेवण्यात यावे, असे आवाहन राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकार अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.