जळगाव - jalgaon
गेल्या ४० वर्षांपासून प्रस्थापितांचा वर्ग जिल्हा बँकेत (District Bank) निवडून येत आहेत. सर्वच राजकीय पक्षातील आजी माजी आमदार , खासदार जिल्हा बँकेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आलेले आहेत. मात्र, कोणत्याही पक्षाने दुसर्या व तिसर्या फळीमध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. म्हणूनच प्रस्थापितांना हादरा देण्यासाठी शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरुन सभासदांकडे मतांचा जोगवा मागणार आहे, अशी माहिती (Congress) आय कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील यांनी जि.प.शिक्षण सभापतींच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, विकास पवार,विकास वाघ, नामदेव बाविस्कर आदी उपस्थित होते.डी.जी.पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा बँक ही शेतकर्यांची आहे. शेतकर्यांच्या हितासाठी शेतकरी पुत्रांना स्थान मिळाले पाहिजे.मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील वगळता इतर प्रस्तापितांचा वर्गच वर्षानुवर्ष जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. आमदार, खासदार यांना एवढे कामे असतानाही जिल्हा बँकेतही त्यांना पदाची हाव सुटत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून माजीमंत्री एकनाथराव खडसे हे संचालक असून त्यांच्या कुटुंबातच पदे वाटप केली जात आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षात समान्य कार्यकर्त्यांना कुठेच स्थान दिले जात नाही. त्यामुळे आता प्रस्थापितांना हादरा देण्यासाठी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही रिंगणात उतरलो आहोत.