
चिनावल ता.रावेर - Raver
रावेर तालुक्यातील चिनावल परिसरात कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) आणि अलीकडचा वादळी पावसामुळे कोट्यावधीचा फटका बसला आहे.
कुकुंबर मोझॅक विषाणूमूळे मोठ्या प्रमाणात बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या येथील बळीराजा अडचणीत सापडला असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे. चिनावल परिसरात यंदा ओला दुष्काळी परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून केळीचे पीक जगविले आहे. मात्र जगविलेल्या केळी पिकावरील कुकुंबर मोझॅक विषाणू करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन निसटली आहे. यावर काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल शेतकरी संभ्रमात असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. येथील शेतकऱ्यांनी लागवडीपासून, आंतरमशागत ठिबक सिंचन प्रणाली, महागडी औषधी यावर मोठा खर्च केला आहे.