मस्कावद,ता. रावेर raver
गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याने मस्कावद सह परिसरात करपा चरखा या बुरशीचा केळी (Bananas) पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे केळी पिकांची वाढ खुंटली असून याचा आर्थिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
बुरशीजन्य रोगामुळे केळी पिकांची पाने खराब होऊन नष्ट होत आहे. त्यामुळे केळी पिकाचे पर्ण नष्ट झाल्यामुळे सूर्यप्रकाशातुन मिळणारा नत्र. पालाश व स्फुरद कमी प्रमाणात मिळत आहे. परिणामी येणारा केळीचा घड व केळी थोड्या प्रमाणात कमकुवत येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
सतत दोन वर्षापासून करोना व्हायरस मुळे केळी उत्पादन शेतकऱ्याला लागवडी खर्चापेक्षा कमी भावात आपली केळी विकावी लागत असल्याने आधीच आर्थिक संकटातून सावरत नाही. तोपर्यंत केळी पिकावर चरखा व करपा या बुरशीच्या आक्रमणामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे.
बुरशीजन्य रोगामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन करावे अशी मागणी मस्कावद सह परिसरात होत आहे.