
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जाणारा गिरणा टाकीच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या चार दिवसापासून जलवाहिनीला गळती लागली आहे. जलवाहिनीतून दिवसभर लाखो लिटर पाणी वाया जात असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना जीवमूठीत घेवून मार्ग काढावा लागत आहे.
जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जाणारी मुख्य जलकुंभ हा गिरणाटाकी जलकुंभ आहे. वाघुर धरणातून पाण्याची उचल होवून कुसूंबा येथील जलशुध्दीकरण केंद्रावर पाणी शुध्द केले जावून जलवाहिनी द्वारे गिरणाटाकी जलकुंभात पाणी येते. मात्र मुख्य जलकुंभ तसेच प्रभाग समिती कार्यालय चारच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर या मुक्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी गेल्या चार दिवसापासून वाया जात आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय देखील असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतांना देखील गळती लागलेल्या जलवाहिनीचे काम मनपा प्रशासनाकडून केले जात नसल्याचे आश्यर्चय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अमृत जलवाहिनीचे कामे सुरु
गिरणाटाकी ते काव्यरत्नावली चौक, भाऊंचे उद्यान येथील जलकुंभापर्यंत अमृत जलवाहिनी टाकण्याचे तिन ते चार ठिकाणी कामे चालु आहे. चर्चरोड येथे जलवाहिनीसाठी रस्ता पूर्ण खोदला असल्याने बाजूच्या कॉलन्यातील लहान गल्ली बोळातून वाहनधारकांना वाहने काढावे लागत आहे. तर काव्यरत्नावली चौकात दोन ठिकाणी तर भाऊच्या उद्यानाजवळ एका ठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्ता बंद केल्याने वाहतुकीचा खोळंबा व अपघात होण्याच्या घटना काव्यरत्नावली चौकात वाढल्या आहे.
अरुंद रस्त्यामुळे धोका
गिरणाटाकी समोरील रस्ता आधीच अरुंद आहे, त्यात जलवाहिनीला गळती लागल्याने रस्त्यातील खड्डयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी निवास्थानाकडून येणार्या रस्त्यापासून ते आस्वाद हॉटेल चौकाकडून गिरणाटाकीच्या मागच्या बाजूला येणार्या रस्त्यापर्यंतच्या रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले आहे. त्यामुळे वाहन धारक तसेच पायी चालणार्यांना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे.
जलवाहिनीची दुरुस्ती का नाही?
गेल्या चार-पाच दिवसापासून गिरणाटाकी येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागलेली आहे. लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असतांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम का हाती घेतले जात नाही असा प्रश्न या परिसरातील नागरिक तसेच रस्त्यावरून जाणार्या वाहनधारकांना पडला आहे.
शिवाजीनगरात जलवाहिनीला गळती
शिवाजीनगरातील मनपाचे डी. बी. जैन रुग्णालयाच्या गेट समोर समोर शुक्रवारी जलवाहिनीला मोठी गळती लागली. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाट काढावी लागत होती. पाणीपुरवठा विभाकडून दुरुस्तीचे काम शनिवारी सुरू केले. काही परिसरात न झालेला पाणीपुरवठा रात्री उशीरापर्यंत सुरळीत करण्याचे काम सुरू होते.