जळगाव । प्रतिनिधी Jalgaon
तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे गेटजवळ अपलाईनवरील रेल्वेच्या धडकेत 43 वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. मयत शेतकर्याचे पद्माकर हरी सोनवणे असे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
म्हसावद येथील रेल्वे लाईनजवळ पद्माकर सोनवणे (वय 43) यांचे शेत असून ते दि.13 डिसेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात जात होते. रेल्वेरुळ ओलांडून शेतात जात असतांना मुंबई अपलाईनवर खंबा क्रमांक 398/10-8 जवळ रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
म्हसावद रेल्वे स्टेशन मास्तरांंनी याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या म्हसावद दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, शशीकांत पाटील, शिवदास चौधरी यांनी घटनास्थळ गाठले.
पंचनामा करुन मयताची ओळख पटवून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला आहे. मयत पद्माकर सोनवणे यांच्या पश्चात पत्नी अलकाबाई, मुलगा रोहित व मुलगी धनश्री असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.