अमळनेर - प्रतिनिधी Amalner
येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन येत आहे. या दिवशी जाहीर सुट्टी नसते त्यामुळे आदिवासी कर्मचारी अधिकारी यांना अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे या दिवसाला सुट्टी जाहीर करा अशी मागणी आदिवासी एकता संघर्ष समिती प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे (Prof. Jayshree Dabhade) यांनी मुख्यमंत्र्यांकडे (Chief Minister Uddhav Thackeray) केली आहे.
तसेच आदिवासी विश्व दिवस ह्या दिवसाची सुट्टी असणे हा आदिवासींचा हक्क आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींच्या सन्मानार्थ ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समुदायाच्या अधिकारांच्या रक्षणार्थ,सन १९९३ हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय देखील घेतला.
देशभरात व महाराष्ट्रात ९ ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. राजस्थान सरकारने जागतिक आदिवासी दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.तसेच अनेक राज्यात जागतिक आदिवासी दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आदिवासी दिनानिमित्त राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात आदिवासी सांस्कृतिक देखावे, रॅली, मेळावे,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर काही जिल्ह्यात आदिवासींचे हक्क व अधिकारासाठी आंदोलन व मोर्चा काढले जातात.
आदिवासी समाजाची अस्मिता, अस्तित्व,स्वाभिमान,संस्कृतीची ओळख, हक्क व अधिकाराची ओळख होऊन कर्तव्याची जाणीव होण्यासाठी , सामाजिक ऐक्य, सलोखा, विविधतेत एकता टिकून राहावी तसेच आदिवासींचे जल, जंगल, जमीन यातील अस्तित्व, सार्वभौमत्व टिकून राहावे,आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी तसेच आमचे अनेक आदिवासी बांधव सरकारी कर्मचारी व अधिकारी आहेत म्हणजेच विविध खात्यात सरकारी नोकरी करतात.या दिवशी सुट्टी नसल्यामुळे आमच्या सरकारी कर्मचारी यांना या दिवशी नाईलाजाने रजा टाकावी लागते. सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे इ-मेल द्वारे आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांनी केली आहे.
या मागणीसाठी पंडित पारधी, विनोद चव्हाण, गुलाब चव्हाण, देविदास पारधी, अनिल पारधी, विजय साळुंके, मनोज पवार, पुनमचंद पारधी, हिम्मत दाभाडे, किरण भिल, निखिल चव्हाण, पवन दाभाडे, सागर राणे, अनिल पारधी, सागर पारधी, राहुल बडगुजर, रोहित चव्हाण, विक्रांत चव्हाण, सदाशिव पवार, राजेश साळुंके, प्रदीप चव्हाण, रावसाहेब भिल, आंनद पवार इ नी पाठपुरावा केला आहे. या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी, अमळनेर उपविभागीय अधिकारी यांना उद्या देण्यात येणार आहे.