बोदवड (प्रतिनिधी) -
शेतकरी दुष्काळातून आणि कोरोनाच्या सावटातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र बोदवड तालुक्यातील सुरवाडा खुर्द आणि बुद्रुक या गावात काल रात्री अवघ्या एक ते दोन तासांत झालेल्या ढगफुटीमुळे पिके होत्याची नव्हती झाली.
दुष्काळातून सावरत असताना पुन्हा आमच्या स्वप्नांवर अस्मानी संकट कोसळले, अशी भावना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील यांनी व्यक्त केली. पिकांसाठी सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा एकरी खर्च झाला होता. दोन ते तीन तास झालेल्या पावसाने सगळंच होत्याचं नव्हतं करून टाकलं. ओढ्याला पूर आल्यानं शेतातील पिकं वाहून गेली. काही विहिरीपण बुजल्या. जवळपास ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. बैल आणि इतर पशुधन नष्ट झाले. याठिकाणी तात्काळ पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी रामदास पाटील व सहकाऱ्यांनी केली आहे.