चाळीसगाव : वृक्षाचा वाढदिवस फुगे लावून केला साजरा
मनोहर कांडेकर
चाळीसगाव | प्रतिनिधी Jalgaon
शहरातील युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने मागील वर्षी हिरापूर रोड स्थित छत्रपती शिवाजी नगर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. वृक्ष लावण्यासोबत त्याच्या संवर्धनावरही लक्ष केंद्रित केले गेले होते.
यासोबतच परीसरात लावण्यात आलेल्या झाडांना एक वर्ष पूर्ण झाल्यावर मोठ्या उल्हासात त्यांचा वाढदिवस आज साजरा करुन, समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. तसेच समाजापूढे झाडे लावा, झाडे गवाच्या माध्यमातून सुंदर उदाहरण प्रस्तुत केले आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनिष मेहता, स्वप्निल कोतकर, इशू वर्मा, युवराज शिंपी, भगवंतराव काटकर, अनिल जाधव, किशोर पुरकर, मधुकर पाटील, देविचरण काटकर, कमलेश मोरे, हर्षल देशमुख, दुर्गेश जाधव, किरण सपकाळ, नितीन देवरे, सागर सुर्यवंशी, विनित गवळी, जयवंत जाधव, प्रशांत पुरकर, योगेश जाधव, ज्ञानेश्वर भामरे अजय चव्हाण, शामकांत देशमुख, अजित काटकर, शिवाजी शितोळे आदी उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपणास वर्षपुर्ती झाल्याने झाडांची पंचारती करण्यात येवून परीसरातील वृक्षांना फुगे लावून सजविण्यात आले होते.
वृक्ष हा हरीत वसुंधरेचा प्राण असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी युवकांनी एकजुटीने पर्यावरणाची शान राखत मानवनिर्मित संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करुन जैवविविधतापूरक वसुंधरा बनवण्यासाठी प्रयत्नांती असायला हवे असे भगवंतराव काटकर यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरणाचे संवर्धन व वृक्षांचे संगोपन करण्याची गरज निर्माण झाली असून पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना करणे काळाची गरज बनली असल्याचे अनिल जाधव यांनी सांगितले. शहरांचा वाढता विस्तार, वृक्षांची होणारी तोड यामुळे शहरांच्या निसर्गसौंदर्यावर, पर्यावरणावर व हवामानावर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवड केल्याशिवाय गत्यंतर नाही.
पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी सामाजिक दृष्टीकोन ठेवून वृक्ष लागवड ही एक सामाजिक चळवळ उभारली जावी म्हणून वृक्षलागवड मोहीम राबविण्यासोबत वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यावर भर दिला असल्याचे स्वप्निल कोतकर यांनी यावेळी सांगितले.