
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
मनपा आस्थापना विभागांतर्गत आजमितीस जवळपास 940 पदे रिक्त असून सन 2013 पासून मनपात भरती प्रक्रिया राबविली गेली नाही, अनुकंपाधारकांपैकी तीन जण मनपाच्याच चुकीमुळे ऐजबार होवून अपात्र ठरले आहेत. त्यांचेसह 60 अनुकंपाधारकांना सेवेत पुनश्च सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे आदी उपस्थित होते.
महापौर पुढे म्हणाले की, मनपाच्या आस्थापना विभागांतर्गत रिक्त असलेली 940 पदे भरण्याबाबत महासभेतही विषय मंजूर करुन घेण्यात येईल, तसेच आयुक्तांना ही पदे भरण्याबाबत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्याचे सांगण्यात येईल.
मनपाच्या चुकीमुळे 3 जण ऐजबार होवून अपात्र झाले आहेत. त्यांनाही कुठेतरी सामावून घेत इतर 60 अनुकंपाधारकांनाही पुनश्च सेवेत सामावून घेण्यात येईल. अनुकंपाधारकांच्या भरती प्रक्रियेला फार काही आडकाठी येणार नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. या 60 जणांना कोविडच्या कामांसाठीही वापरात घेवू शकतो असेही त्यांनी सूचित केले.
ऑनलाईन सभेबाबत माहिती
मनपात प्रथमच गेल्या साडे चार महिन्यानंतर होणारी मोठी सभा ही आजची 12 रोजीची महासभा ऑनलाईन पध्दतीने पार पडणार आहे. या ऑनलाईन पध्दतीची रुपरेषा कशी असणार याबाबत महापौर, सभापतींनी माहिती दिली. तीन ठिकाणी ऑनस्क्रीन असतील. नगरसेवक हे घरीच ऑनलाईनवर असतील. मनपा सभागृहाच्या दालनात व्यासपीठावरील पदाधिकारीच असतील.
यात आयुक्त, महापौर, नगरसचिव यांचा समावेश असेल तर अन्य पदाधिकारी दुसर्या एका ठिकाणी असतील, जेणेकरुन एका ठिकाणी गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल, सॅनिटायझेशनचा वापर केला जाईल, कुठलीही गडबळ, गोंधळ होणार नाही. प्रत्येक सदस्याला त्या त्या मुद्यावर बोलण्याची संधी दिली जाईल. त्यांचे म्हणणे काय ते ऐकूण घेण्यात येईल, तसेच महासभेतही विकासाभिमुख व लोकाभिमुख मुद्यांवर मंजुरी घेण्याबाबतही नियोजन करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी 58 कोटीच्या निधीसाठी प्रयत्न करावा
नगरोत्थान अंतर्गत रस्ते विकासासाठी मंजूर 100 कोटीच्या निधीपैकी 42 कोटीची निविदा निघालेली आहे. उर्वरित 58 कोटीचा निधी हा आणायचा बाकी आहे. या निधीसाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावा, शहर विकासासाठी हा निधी पालकमंत्र्यांनी आणला तर भाजपा त्यांचे आभारच मानेल, तसे कुठलाही किंतु परंतु न ठेवता पालकमंत्र्यांनी निधी मंजूर करुन आणल्यास भाजपा त्यांचे आभार मानेल, असे मत यावेळी गटनेते भगत बालाणी यांनी स्पष्ट केले.