
वरणगाव, Varangaon, ता.भुसावळ । वार्ताहर
शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची (drinking water) भीषण टंचाई (severe shortage)निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सुस्त प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेतर्फे (Shiv Sena) बोंबाबोंब आंदोलन करुन न.पा. प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करावी, वरणगाव शहर शिवसेनेच्या वतीने हंडा मोर्चा (Handa Morcha) काढण्यात येणार असल्याचा इशारा दि.28 फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी समीर शेख, कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी यांना निवेदनातून देण्यात आला.
ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरात पंधरा ते वीस दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना उन्हाळ्यात तोंडावर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील नगरपरिषदेवर प्रशासक राजवट असल्याने पिण्याच्या पाण्याची कुठलीही उपाययोजना करीत नसल्याने सुस्त प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जोरदार बोंबाबोंब आंदोलन केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना 15 ते 20 दिवसांनी पाणी मिळते तर एप्रिल, मे मध्ये नागरिकांचे काय हाल होतील? आतापासूनच प्रशासक/मुख्याधिकारी यांनी यावर उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतांना शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्यांक जिल्हा उपसंघटक शेख सईद, युवा सेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख सुनील भोई, शिवा भोई, शाखाप्रमुख संजीव कोळी, विकी मोरे, आबा सोनार, संजीव खराते, नंदू खराटे, राहुल इंगळे, इरफान शेख, उपशाखाप्रमूख योगेश सतावकर, प्रवीण वाकोळे, मुकेश चंदने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
25 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काय?
शहरासाठी नवीन 25 कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. परंतु या योजेनेच्या कामाला तीन वर्ष मुदत संपल्यानंतरही ही योजना पूर्ण झाली नाही. अरिहंत कन्स्ट्रक्शन पुणे येथील या कंपनीने हे काम घेतले असून ते पूर्णपने निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम तीन फुट ऐवजी दोन फुटावर टाकण्यात येत आहे. नेमका या निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराला प्रशासनाचा आशीर्वाद असल्यानेच हा संबंधित ठेकेदार निकृष्ट काम करीत आहे. विकास कॉलनी आणि प्रतिभा नगरमध्ये पाण्याची टाकी मंजूर नाही. तरीपण त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येत आहे. पाण्याची टाकीच अजून मंजूर नाही तर मग पाईपलाईन कशासाठी? हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. पाईपलाईन टाकायची आणि लगेच बील सादर करून बीले काढण्याचे काम सध्या ठेकेदार जोरात करत असल्याचा आरोप देखील यावेळी शहरप्रमुख संतोष माळी यांनी केला आहे.
तांत्रिक अडचणीमुळे टंचाईच्या झळा
शहराला तपत कठोरा येथील तापी नदीच्या पात्रातून योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, योजनेतील वारंवार विज पुरवठा खंडीत होणे, पावसाळ्यात जॅकवेलमध्ये पुराच्या पाण्याचा गाळ साचणे, आठ किलोमिटर अंतरावरील मुख्य जलवाहीनीला गळती लागणे अशा अनेक कारणांमुळे शहरवासीयांना दहा ते बारा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यातच उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहराला पाणीपुरवठा करणार्या तापी नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने योजनेवरील पाण्याचा उपसा करणारा जॅकवेल उघडा पडला असुन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
हा प्रकार नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी सोमवारपासुन युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. मात्र, या कामाला किमान चार- पाच दिवसांचा कालावधी लागणार असल्याने आधीच शहरवासीयांना उशिराने होणारा पाणी पुरवठा पुन्हा चार-पाच दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील नागरीकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन दवंडीद्वारे केले जात आहे.
हातपंपही नादुरुस्त
पाणी टंचाईच्या काळात शहरवासीयांना दिलासा मिळावा यासाठी शहराच्या विविध भागात हातपंप (कुपनलिका) तयार करण्यात आलेल्या आहेत. मात्र, यापैकी दहा ते बारा हातपंप गेल्या दहा महिन्यापासुन बंदावस्थेत असल्याने नविन भागातील नागरीकांना पदरमोड करून खाजगी कुपनलिका तयार कराव्या लागत आहेत. असे असुनही, त्यांना नगरपरिषदेची पाणीपट्टीचा कर भरावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.