
जळगाव - jalgaon
जिल्ह्यातील संभाव्य 592 गावांसाठी 9 कोटी 90 लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी मंजूर केला आहे. दरम्यान हा कृती आराखडा शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
सन 2023-24 साठी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला. यात जिल्ह्यात आगामी काळात 592 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असून उपाययोजना राबविण्यासाठी 9 कोटी 90 लाख 74 हजार रूपयांचा खर्च लागणार आहे. हा आराखडा जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला होता. गुरूवारी जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या स्वाक्षरीने या आराखड्याला मंजूरी देण्यात आली असून हा आराखडा शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
चाळीसगावात टँकर सुरूच
जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसाळा संपूनही पाणीटंचाईची परीस्थिती आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील 13 गावांमध्ये 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
संभाव्य पाणीटंचाईची गावे
अमळनेर - 109 भडगाव - 17 भुसावळ - 9 बोदवड - 12 चाळीसगाव - 57 चोपडा - 87 धरणगाव -31 एरंडोल - 28 जळगाव - 21 जामनेर - 69 मुक्ताईनगर - 20 पाचोरा - 25 पारोळा - 85 रावेर - 9 यावल - 13 एकूण - 592