पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर
वाचनाची (Reading) माध्यमं वाढली पण वाचकांची (Readers) संख्या वाढली नाही. व्हाट्सअॅप वाचण्यापेक्षा ग्रांथिक वाचन (Glandular reading) फार महत्त्वाचे असते. देशाचा इतिहास आणि भूगोल जर बदलायचा असेल तर आपण वाचन केले पाहिजे, असे मत शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.फुला बागुल (Prof.Dr. Phula Bagul) यांनी व्यक्त केले.
येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पिंपळनेर येथे मराठी भाषा विभागाच्या व विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी. सोनवणे, उद्घाटक प्रा. डॉ. सचीन नांद्रे (दहिवेल) व प्रमुख अतिथी म्हणून सी.गों.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे हे उपस्थित होते. डॉ.फुला बागुल म्हणाले की, कालची वाचनसंस्कृती समृद्ध होती म्हणून भारत प्रगतीपथावर आहे. वाचन संस्कृती होती म्हणून आज आपण देशाला प्रगतीपथावर घेऊन जात आहोत. पूर्वी शिळा पेपरही आतुरतेने माणसं वाचत होती. वाचनाची भूक किराणा कागदावरुनही भागवली जात होती. पण आज वाचनाची टक्केवारी खूप कमी झाली आहे. वाचनाचा छंद जोपासला नाहीतर आपल्याला भविष्य नाही. वाचनानेच जगाचा इतिहास बदलला आहे. लेखकाच्या लेखनाने क्रांती केली आहे. वाचनाने क्रांत्या झाल्या आहेत. व्हाट्सअप तुम्हाला माहिती देईल पण ग्रंथ तुम्हाला ज्ञान देतील. तरुणांनी विनोदी वाचन करण्यापेक्षा वैचारिक वाचन करावे. राष्ट्र घडवण्यासाठी, देशाचा इतिहास व भूगोल बदलण्यासाठी वाचन केले पाहिजे.सामाजिक न्यायासाठी वाचन करावे, जगाकडे बघण्याचा उदात्त दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी वाचन करावे, असे सांगून काय काय वाचावे सांगितले.
प्रा. डॉ. सचिन नांद्रे म्हणाले की, मराठी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. तिच्यामध्ये प्रचंड गोडवा आहे. मराठी भाषेचा इतिहास वैभवशाली आणि संपन्न असा आहे. तो प्रत्येकानं जतन केला पाहिजे. रोज झोपताना प्रत्येक विद्यार्थ्याने काही ना काही तरी वाचन केले पाहिजे. वाचनाने माणूस बहुश्रुत होतो. वाचन माणसाला समृद्ध करत असतं.
प्राचार्य डॉ. आर.आर.अहिरे यांनी वाचनसंस्कृती बरोबरच श्रवणशक्ती वाढविणे गरजेचे आहे. बोलणारा वक्ता अनेक पुस्तकं वाचून ज्ञान देण्याचे काम करत असतो. ते आपण चांगले ग्रहण केले तर आपल्याला ज्ञान मिळत असते. पण हल्ली श्रवण क्षमता लोप पावताना दिसत आहे ती श्रावण क्षमता प्रत्येकाने वाढवून, शब्दकोशाचा अभ्यास करून आपले जीवन घडवून समाजोपयोगी झाले पाहिजे. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.एस.टी.सोनवणे यांनी केला. सूत्रसंचलन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केले. आभार प्रा.एल.जे.गवळी यांनी मानले.