खान्देशला पेपरफुटीचे ग्रहण

खान्देशला पेपरफुटीचे ग्रहण

मोठा गाजावाजा करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा जाहीर केलेला निर्णय पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या अंगाशी आल्याचे दिसून आले आहे. खान्देशात तर पेपरफुटीचे ग्रहणच लागले आहे. जळगाव जिल्ह्यात पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनीटांआधीच तर नंदुरबार जिल्ह्यात पेपर सुरू झाल्यानंतर 20 मिनीटांत प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

10 वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी पेपर सुरु होण्यापुर्वीच मराठीचा पेपर फुटला. मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा गावात हा प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे . परीक्षा सुरु होताच काही वेळातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याने पेपरफुटीचे प्रकरण समोर आले त्यावेळी शिक्षणविभागाचे भोंगळ नियोजनही समोर आले.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात झाली आहे. मराठीचा पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी केंद्रावर पोहचले होते.मात्र पेपर सुरू होण्यापुर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या परिसरात केवळ प्रश्न पत्रिकाच व्हायरल झाली असे नव्हे तर मोठ्या प्रमाणावर मराठीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट देखील पाहायला मिळाला आहे.

राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी आहेत तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. संपुर्ण राज्यात 4979 परिक्षा केंद्रे आहेत. परीक्षा काळात गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत एकुण 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्याने परिक्षा कक्षात अर्धा तास आधी उपस्थित असणं आवश्यक असल्याची सूचनाही करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com