Thursday, April 25, 2024
Homeजळगावअनिष्ट प्रथा बंद करा

अनिष्ट प्रथा बंद करा

जळगाव  –

ज्या तरुणांच्या पिढीवर अवलंबून राहून आपण महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहोत, त्या तरुणांची प्रतिनिधी मानसी बागडे हिला जर आत्महत्या करावी लागत असेल तर महासत्तेची स्वप्न बघण्याचा आपल्याला अधिकार आहे काय ? तरुणांच्या आशा, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी जातपंचायत आडवी येणार नाही हा आशावाद तरुणांच्या मनात निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

तर सामाजिक कार्यकर्ते व कंजरभाट समाजाचेच कृष्णा इंद्रेकर यांनी समाजातील खंडणी, कौमार्य चाचणीसह अनिष्ठ रुढी बंद करा त्या बंद करण्याबाबत लेखी द्या; अन्यथा लढा सुरूच राहील, असा घणाघात यावेळी केला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जळगाव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने आणि समविचारी संघटना-संस्था यांच्या सहभागाने जातपंचायतीला मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे रविवारी 1 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे यांच्यासह जातपंचायतीला मूठमाती अभियान विभागाचे राज्य प्रमुख कृष्णा चांदगुडे, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, बानोताई बागडे, राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, सामाजिक कार्यकर्ते व कंजरभाट समाजाचे कृष्णा इंद्रेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा महिला असोसिएशन अध्यक्षा राजकुमारी बाल्दी उपस्थित होते.

या परिषदेचे उद्घाटन मानसीची आई बानोताई यांच्या हस्ते जातपंचायतीच्या बेड्या तोडून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. कौमार्य चाचणी, बालविवाह, शोषक जातपंचायत अशांच्या बंधनातून तरुणीला मुक्त करून हे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात कृष्णा चांदगुडे यांनी, राज्यात जातपंचायतींचे अस्तित्व दिसून आल्यानंतर त्यांच्या शोषक बाबींविरुद्ध अंनिसने आवाज उठविला असे सांगत परिषद घेण्यामागील भूमिका विशद केली. आ.राजूमामा भोळे म्हणाले की, भारतीय संविधानानुसार आम्ही काम करतो. संविधानाचे पालन सर्वांनी केले पाहिजे. जीवनात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. संत, समाजसुधारकांनी केलेले विचारपरिवर्तनाचे काम पुढे गेले पाहिजे. आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था चांगली निर्माण झाली पाहिजे. मी अंधश्रद्धा मानत नाही, माझा अंनिसच्या कामाला पाठींबा आहे. प्रत्येक समाजात चुकीच्या रूढी, प्रथा असतील तर दूर झाल्या पाहिजेत, असेही आ. राजूमामा भोळे म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील यांनी, जातपंचायतींच्या जाचांना सामाजिक पातळीवर सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. याविषयी शासन प्रचंड उदासीन आहे. जातपंचायतींनी पिडीत व्यक्तींना आधार देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे महत्वाचे आहे. प्रशासनातील अधिकार्‍यांना योग्य प्रशिक्षण नसल्यानेच जातपंचायती फोफावल्या आहेत, असे सांगितले. यावेळी बिंदीया नांदेडकर यांनीही प्रत्येक स्त्रीला जगण्याचा अधिकार आहे, तिच्या मनाप्रमाणे जगू द्यावे असा मुद्दा माडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या