Thursday, April 25, 2024
Homeक्रीडायंदा आयपीएल होणार रद्द?

यंदा आयपीएल होणार रद्द?

सार्वमत

मुंबई – कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. याआधी मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता आणि त्याची मुदत 14 एप्रिलला संपणार होती. मात्र गेल्या काही दिवसात देशात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन आणखी 19 दिवस वाढण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम होण्याची शक्यता मावळली आहे. याआधी परिस्थिती पाहून 15 एप्रिल पासून आयपीएल खेळवण्यात येणार होते, मात्र आता आयपीएल होण्याची शक्यता कमी असून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही याबाबत संकेत दिले आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयच्या सूत्रांनी आयपीएल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. मात्र यावेळी तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. यामागे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक आणि भारतातील वातावरण यांची महत्वाची भूमिका आहे. कारण सद्यपरिस्थितीत आयपीएल डिसेंबर पूर्वी खेळवणे अशक्य आहे. कारण जुने ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यामुळे या काळात सामने ठेवणे अशक्य आहे. 18 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप सुरू होणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत वर्ल्डकप चालेल. यानंतर देखील आयसीसीच्या वेळापत्रकानुसार मालिका आहेत. त्यामुळे डिसेंबर पूर्वी आयपीएल आयोजित करणे सध्या तरी अशक्य वाटत आहे.

आयपीएल विसरा – सौरव गांगुली
‘आम्ही सद्यपरिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सध्या काहीही स्पष्ट बोलू शकत नाही. आता काहीच पर्याय दिसत नाहीये. विमानतळ बंद आहेत, लोकांना घरात थांबणे गरजेचे आहे, सर्व कार्यालय बंद आहेत. कोणीही कुठे जाऊ शकत नाही अशीच परिस्थिती पुढील महिन्यापर्यंत राहू शकते. अशा स्थितीत खेळाडूंना कुठे नेता-आणताही येणार नाही. सध्या जगभरातील कोणत्याही खेळासाठी ही परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे आयपीएलही विसरा असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला, सध्या परिस्थिती भीतीदायक आहे. मी 46 वर्षात अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही आणि पुढेही पहायची इच्छा नाही. सध्या जगभरातील लोक फक्त किती मृत्यू होत आहेत याचे आकडे मोजत आहेत आणि हे भयानक आहे.

.…तर 3 हजार कोटींचे नुकसान
आयपीएल रद्द करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु जर आयपीएल रद्द झाले तर जवळपास 3 हजार कोटींचे नुकसान होईल असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले. यात बीसीसीआय, स्पोर्ट चॅनेल, संघ मालक आणि खेळाडू यांच्याही नुकसानीचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या