पंचवटी | प्रतिनिधी
कालपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू असताना नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची आणि खरेदीदारांची मोठी गर्दी आज सकाळपासून उसळली होती. मोठ्या संख्येने झालेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाची दमछाक झाली.
राज्यात सध्या कोरोना विषाणूने प्रचंड थैमान घातले आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील संख्या शंभराच्या पार गेली आहे. तर कोरोना बाधित चौथ्या रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.
असे असताना राज्यात संचारबंदी काळात बाजार समितीमध्ये अनावश्याक्क गर्दी का असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.
संचार बंदी लागू करत असताना राज्यात भाजीपाला, किराणा, वैद्यकीय सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र, कुठलीही जीवाची पर्वा न करता अनेकांनी बाजारसमितीमध्ये अनावश्यक गर्दी केली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हाभरातून भाजीपाला विक्रीसाठी शेकडो गाड्या दाखल झाल्या होत्या.
संचारबंदीमध्ये भाजीपाला मिळेल कि नाही या धास्तीने अनेकांनी जास्तीचा भाजीपाला खरेदी केला. त्यामुळे गर्दीत अधिकच भर पडली.