अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आरोग्य खात्यात काम करणार्या नियमित आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचार्यांचे वेतन नियमित व्हावेत, वर्ग 3 कर्मचार्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत,
सुधारित प्रवास भत्ता मिळावा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावीत, यासह अन्य मागण्यासाठी राज्यातील आरोग्य कर्मचार्यांनी गुरूवारपासून अहवाल बंद आंदोलन पुकारले आहे. यात जिल्ह्यातील 1 हजार 300 आरोग्य कर्मचारी सहभागी झाले असून त्याचा करोना रिपोर्टींग अहवालावर परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना यांनी हे अहवाल बंद आंदोलन पुकारले असून आंदोलनात कालपासून जिल्ह्यातील नियमित आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे आरोग्य कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विलास शेळके आणि सचिव संजीव दुसा यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या आरोग्य विभागात 92 आरोग्य सहायक पुरूष, 84 साहयक महिला, 360 आरोग्य सेवक, 495 आरोग्य सेविका, यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानात 62 एएनएम, 178 कंत्राटी आरोग्य सेविका कार्यरत आहेत. अशा सर्व 1 हजार 280 आरोग्य कर्मचार्यांनी अहवाल बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे.
या कर्मचार्यांनी वेतन नियमित व्हावेत, वर्ग 3 चे आरोग्य पुरुष आणि स्त्री यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, सुधारित प्रवास भत्ता मिळावा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावीत, जिल्ह्यातील 156 आरोग्य कर्मचार्यांना स्थायीत्वाचा वर्षभरपासून रखडलेला लाभ देण्यात यावा, 29 आरोग्य कर्मचार्यांची सेवानियमित करून त्यांना सेवेचा लाभ देण्यात यावा, राष्ट्रीय ग्रामीण अभियानाचे कंत्राटी कर्मचार्यांना कायम सेवेत घ्यावे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 10, 20 आणि 30 वर्षानंतर आश्वासित योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागणी केले आहेत. राज्य सरकारने या मागण्या मान्य न केल्यास ऐन करोना काळात तीव्र आंदोलनाचा इशारा या कर्मचार्यांनी दिला आहे.
असा ही धक्का
गुरूवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने करोनाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीत पहिल्यांदा करोनाच्या एकूण रुग्ण संख्येत 5 रुग्णांची भर पडल्याचे स्पष्ट केले. ही आकडेवारी पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. करोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे वाटत असतांना आरोग्य कर्मचार्यांनी अहलवा बंद आंदोलन पुकारल्याने काल सकाळी नव्याने अवघे 5 करोना बाधित असल्याचे समोर आले. त्यांनतर सायंकाळच्या अहवालात जिल्ह्यात ४०५ करोना बाधित असल्याचे समोर आले. आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल बंदचा हा परिणाम असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.