नाशिक । Nashik
करोना संकटामुळे शासनाने रेशनकार्डला आधार लिंक नसले तरी अशा लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरीत करावे असे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात बहुतांश रेशनधारकांनी आधार लिंक केले आहे.
शहरात दीड ते दोन हजार कार्डधारकांना आधार लिंक न केल्याचा फटका बसला. परंतू या लाभार्थ्यांना जर रेशनला आधारची लिंक केली तर पूर्ववत त्यांना धान्य वितरीत केले जाणार आहे.
रेशनकार्डला आधारची जोडणी न केल्यास १५ मार्चपासून धान्य बंद केले जाणार होते. पण कोरोनाचे संकट पाहाता शासनाने कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहू नये अशी भूमिका घेतली आहे. रेशनमधील काळा बाजार थांबविण्यासाठी शासनाने एईपीडीएस ही प्रमाणाली राज्यात लागू केली.
त्यानुसार धान्याची मागणी देखील ऑनलाईनच केली. तर रेशनाकार्ड धारकांंनाही बायोमेट्रीक आणि इपॉस मशीनद्वारेच रेशन वितरणाची सुविधा सुरु केली. ज्यांनी धान्याची उचल केली नाही, अशा कार्डधारकांचे धान्य संबधित दुकानदारांकडे प्रलंबित दिसू लागले. त्यामुळे धान्यातील चोरीही थांबली.
तर पुढच्या वेळी तेवढे धान्य कमीच करण्यात येते. म्हणजे जेवढे धान्य वितरीत केले जाते, तेवढेच ते पुन्हा दिले जाते. परंतू दुकानदारांकडून त्यात प्रतिसाद दिला जात नाही. आणि नागरिकच वेळेत सर्व बाबी पूर्ण करत नसल्याचे कारण दिले जाते. त्याचीच दखल घेत शासनाने थेट रेशनकार्डला आधार जोडणी न करणाऱ्यांचे धान्यच १५ मार्चपासून बंद करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार नाशिक शहरातील दीड ते दोन हजार रेशनधारकांना धान्याचे वितरण झाले नाही. परंतू आता पुन्हा नव्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कठोर निर्बंध होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने सरसकट सर्वांनाच धान्याचे ग्रामीण भागात वितरण सुरु केले. शिवाय ज्यांना धान्य मिळाले नाही, अशांनाही त्यांना आधार लिंक केल्यास तत्काळ त्यांचे मागली महिन्याचेही धान्य दिले जाईल. असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कुणाचेही रेशन थांबविले नाही. ज्यांनी अद्याप लिंक केले नसेल त्यांनी रेशन दुकानावर जाऊन लिंक केल्यास अन्नधान्य देणव पूर्ववत केले जाईल.
– अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी