नाशिक । प्रतिनिधी
सध्या कांद्याचे दर घसरल्याने झालेला खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे. त्यामुळे उत्पादकांमध्ये कमालीची नाराजी आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. लॉकडाऊनच्या काळात नॅशनल अॅग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘नाफेड’ ही संस्था गुजरात व महाराष्ट्रातून नऊशे रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. शेतकर्यांना विक्रीचा पर्याय मिळावा, देशात कांदा विक्रीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून ‘नाफेड’तर्फे दरवर्षी कांदा खरेदी केला जातो.
करोनामुळे यंदा कांदा उत्पादकांना दराची चिंता वाटत होती. मात्र, आता नाफेडने गुजरात व महाराष्ट्रातून कांदा खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
शेतकर्यांना किमान नऊशे रुपये दर निश्चितपणे मिळणार आहे. व्यापार्यांना त्यापेक्षा कमी दराने खरेदी करता येणार नाही. जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील व्यापार्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन संघटनेचे राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी केले आहे. दरम्यान, ‘नाफेड’ने गेल्या वर्षी गुजरात व महाराष्ट्रातून 57 हजार क्विंटल कांदा खरेदी केला होता.
चालू वर्षी त्याच प्रमाणात कांदा खरेदी केल्यास उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान,जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दररोज सुमारे ८९ हजार क्विंटल कांदा विक्रीला येत आहे.