समीक्षक का व कसा असावा ?

समीक्षक का व कसा असावा ?

कोणत्याही साहित्यिकाने प्रसवलेले साहित्य हे त्याला आपल्या अपत्यासमान प्रिय असते. ते कसेही असो त्याच्या नजरेतुन त्याला ते श्रेष्ठच दिसते. त्यातच खरा आनंद असतो.कारण स्वतःला पटनं हेच महत्वाचे असते. पण जगाच्या बाजारात त्या साहित्याने मान सन्मान मिळावावा असे जर वाटले तर ते ईतरांच्या नजरेतुन पारखुन घेतले पाहिजे.

स्व तःला स्वतःचे गुण दोष दिसत नाहीत.म्हणुन ते ईतरांच्या नजरेतुन पाहायला हवेत,कारण आपल्या कोषातुन बाहेर पडल्याशिवाय विशाल जगाची अनुभुती मिळत नाही. शिवाय आपले साहित्य बाळ आपल्या व आपल्याच माणसांच्या अती लाडाकोडात त्याची वाढ खुरगटायला नको,त्याचे बोनसाय व्हायला नको .

कारण आपल्या प्रेमापोटी वा भिडस्त स्वभावाने समोरची आपली माणसे,ते साहित्य कसंही असलं तरी वाहवा करत कौतुकच करतात.म्हणुन त्याच्यातलं श्रेष्ठत्व वा उणीवा कळत नाही.म्हणुन समीक्षकाच्या कडा पहार्यात त्याला वळण व शिस्त लागायलाच हवी.एकापेक्षा एक विद्वान माणसे असतात.वरुन दिसत नसली तरी अंतरंगात ज्ञानाचा भंडार असलेली माणसे असतात.त्यांच्या सहवासात आपल्या साहित्यकृतीला समीक्षणाच्या लसी,डोस वा कढू बालघुटी त्याला बाल्यावस्थेपासुनच मिळायला हव्यात.म्हणजे ते बाळ सुदृढ होऊन पुढे बलवान बनेल व जगाच्या स्पर्धेत तग धरेल. पण त्यासाठी समीक्षक कसा असावा?हा खुप महत्वाचा प्रश्न आहे.

कारण ज्याला ऊत्तम समिक्षक मिळाला तो भाग्यवान समजावा.बरेच समीक्षक फारच ऊत्तम समीक्षा करतात.पण काही मात्र हातात दंडुका घेऊन नवशिक्या साहात्यिकाला भेदरावून टाकतात. समीक्षक हा मायेच्या ममतेने शिकवणारा असावा.पहिलटकरीण बाईचं पहीलं बाळ समजुन त्याला लळा लावत समीक्षा करणारा असावा.

समीक्षा ही पाठीवर कौतुकाची थाप ठेवत ठेवत हळुच रट्टा मारणारी असावी, प्रेमाने आंजरता गोंजरता हळुच कान पिळणारी असावी, ऊगाच गुडुगुडी नको व अनावश्यकपणे हातात छडी घेऊन धोपटुन टाकणारी ही नसावी, मायच्या ममतेने समजावून सांगतांनाच,गुरुजीच्या थाटात काठी चा धाकधपडशा दाखवणारीही असावी, मडके घडवणार्या कारागीर सारखी बाहेरुन आकार देण्यासाठी पिटत असला तरी आतुन तो सहार्याचा हात ही ठेवत असतो.

शिवाय समीक्षण हे तोंड वेंगाळुन नाकातुन सुर काढत चुकाच शोधणारे नसावे, दुर्बीण लावून चुका हुडकायच्या ऊन्मादात काही चांगल्या गोष्टी नजरेतुन सुटुन जातात व त्या पोरक्या होतात. समीक्षक हा टोकाचा टिकाकार व जास्तीचा चिकीत्सकही नसावा.

स्वतःच्या ज्ञानाचे फुका प्रदर्शन करणारा नसावा.नवशिख्या माणसाजवळ आपले श्रेष्ठत्व गाजवत त्याला नाऊमेद करणारा नसावा, त्याला ऊभारी देणारा, प्रोत्साहन देणारा असावा, पहिलीच्या मुलाची परीक्षा घेतांना दहावीचे निकष लावणारा नसावा. सर्वांना एकच तराजुत तोलणारा नसावा, मुळातच साहित्य ही काही पुस्तकी ज्ञानाची व वेगवेगळ्या डिग्र्यांची जहागीरदारी वा मक्तेदारी नसते, ते अंतःप्रेरणेतुन पाझरलेले असते, म्हणुनच तर ते अपत्य असते, ते अडाणीही प्रसवू शकतो, कुठल्याही शाळेचे तोंड न पाहिलेल्या, जुजबी शिकलेल्या माणसांनीही दर्जेदार साहित्याची निर्मिति केलेली आहे.

कुठलीहि पदवी नसतांना ऊत्तमोत्तम साहित्याची निर्मिती करणारे साहित्यिकही आहेत, अशा साहित्यिकांच्या साहित्यकृतीकडे पुस्तकी ज्ञानाचे निकष लावून त्यात लांबी रुंदी शोधण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा, जरा मायेच्या ममतेनेच हा प्रयत्न झाला पाहिजे,म्हणजे लेखन्या फुलतील,साहित्य निर्मिती होईल.

आत्ताच्या डिजीटल युगातील नवी पिढी फार सुंदर लिखान करते, त्यांची विचार करण्याची ताकद वाखाणण्याजोगी आहे.त्यांच्या साहित्यकृतीला जुन्या काळातील सहाणीवर घासुन पुसुन पारखण्याचाआग्रह का म्हणुन करावा?

फास्ट पिढीतल्या या लेखनात शुध्दलेखन व र्हस्व दीर्घ पाहण्यापेक्षा त्यातला आशय विषय व भावना समजुन घेऊन समिक्षा झाली पाहिजे असे माझे वैयक्तीक मत आहे, समीक्षण हे पुर्वग्रहदुषीत नसावे ते सुंदर व स्वच्छ मनाचे असावे. नीरक्षीर वृत्तीने निःपक्षपातीपणे टिपकागदासारखं टिपणारं असावे. चांगल्याला अलगद टिपुन वांगल्यावर संस्कार करणारे असावे. निर्भिड, निर्मळ निरपेक्ष व निर्णायक असावे, असे झाले तर सुंदर, दर्जेदार साहित्यकृत्तींची निर्मिती होईल.

अन्यथा ऊसनवारीने, दडपणाने, चांगुलपणाने, स्तुती सुमनांने केलेल्या समीक्षणातुन येणारे साहित्याचे बाळ पुढच्या कसोट्यांमध्ये फरफटत जाते. कृत्रीम आहारातुन वाढलेल्या बाळापेक्षा नैसर्गिक अन्नपदार्थांचे सेवन केलेले बाळ प्रभावी असते, भारी भारी कृत्रीम कपड्यातले मुडदुस सारखे दिसणारे बाळ हवे की, फाटक्या कपड्यातले अस्सल धष्टपुष्ट बाळ हवे हे प्रत्येकाने ठरवावे. साहित्य असो वा अपत्य दोन्हीकडे हाच नियम असावा का?

मोहनदास भामरे, धुळे 98505 15422

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com