नाट्यगृहात नाटकांची पुन्हा नांदी

नाट्यगृहात नाटकांची पुन्हा नांदी

नाशिक | शुभम धांडे | Nashik

ये अरे..! ती लेव्हल आतामध्ये घे, तो मोडा पहिल्या विंगेत आणून ठेव, लाईट (light) बघ, स्पॉटची मार्किंग (Marking of spots) बघ, तू म्युझिक (music) चेक कर, तुला तुझा प्रवेश लक्षात आहे ना, बर मग ऐका, सगळे तयार का, म्हणत गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात नाटकाच्या तिसर्‍या घंटेसह नाटक (drama) सुरू होते.

गेल्या दीड वर्षांत क्वचितच हा सगळा उत्साह ऐकायला, किंबहुना पाहायला मिळाला. त्यानंतर आता करोनातून (corona) बाहेर पडत येत्या 22 ऑक्टोबरला पुन्हा एकदा नाटक नव्या उमेदीने सुरू होणार आहेत. करोना काळाने सर्वांचीच कठोर परीक्षा पाहिली असली तरी रंगभूमीचा (theater) या संकटाने जणु अंत पाहिला. अर्थात रंगभूमीने याआधी अनेक संकटे झेलली आहेत ती यातूनही नवी भरारी घेईल हे नक्की.

मात्र मोठ्या कालावधी नंतर रंगभूमी पुन्हा सुरू होणार याचा आनंद असला तरी गत अनुभवावरून थोडी धास्ती सुद्धा आहे. कारण मागच्या वेळी पहिल्या लाटे नंतर सुरू करण्यात आलेली रंगभूमी काहीं दिवसातच बंद करण्यात आली. वरकरणी पाहता यांचे मोजके परिणाम दिसत असले तरी या मध्येच सुरू आणि मध्येच बंद करण्याच्या निर्णयामुळे विस्कटलेली रंगभूमीची गणितं पुन्हा तितक्याच ताकदीने जुळवन हे एक मोठे आव्हान आहे.

कारण मधल्या काळात व्यावसायिक नाटक करणारी अनेक मंडळी रंगभूमी बंद म्हणून दोन वेळच पोट भरण्यासाठी नव्या वाटांकडे वळली. त्यानंतर आता जेव्हां हे सगळं पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे तेव्हा या सगळ्या कलावंत मंडळींना त्यांच्या त्या बद्दलेल्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे जोडण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी कसोटी असणार आहे.

या कलावंतांच्या प्रश्ना शिवाय आणखी महत्वाचा घटक तो म्हणजे नाटकाचा प्रेक्षक. या सर्व महामारीच्या काळात त्याचीही मानसिक अवस्था (Mental state) काहीशी बदली होती. त्याच्या साठी नाटक, रंगभूमीवर होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural events) जरी जगण्याचे भाग नसले तरीही त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात आनंदाचे, नव्या उत्साहाचे रंग भरणारे स्त्रोत होते.

मग बंद नाट्यगृहामुळे मनोरंजनासाठी टीव्ही (TV), ओटीटी (OTT), यूट्यूब (YouTube) तसेच सोशल मीडियावर (social media) अनेक प्रेक्षकांनी मोर्चा वळवला. मात्र आता रंगभूमी पुन्हा सुरू होताना प्रत्यक्ष नाटकाचा रसस्वाद अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना नाट्यगृहात येवून या वातावरणात सकारात्मक ऊर्जा भरावी लागेल. कारण कोणत्याही कलाकाराला प्रेक्षकांची दाद त्याच्या कलाकृतीला नव्या उंचीवर नेण्यासाठी मदत करते.

त्यामुळे तुटलेली ही कलाकार प्रेक्षकांची नाळ जोडण्यासाठी दोन्हीं बाजूंनी एकत्र पूढे येण्याची गरज आहे. त्यात राज्य सरकारी नियमानुसार सुरुवातीला 50 टक्के क्षमतेनुसार नाटक सुरू होणार आहेत. पण नाटकाचे आर्थिक गणित पाहता, सर्वांनी काळजी घेतली तर 100 टक्के क्षमतेनेही सुरू होणे ही अपेक्षा नाटय संस्थांना आहे. आंनदासोबत काहीं अडचणी आहेत. पण लोकांच्या मनावर आलेली मरगळ या नाटयक्षेत्राच्या पुन्हा उघडणार्‍या पडद्या सोबत झटकली जाईल आणि एक आशावादी वातावरण तयार होईल हिच अपेक्षा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com