राहू आनंदी!

jalgaon-digital
7 Min Read

– स्वाती पेशवे

सध्याची परिस्थिती अत्यंत तणावग्रस्त आहे. विविध समस्यांनी आयुष्य ग्रासलेलं आहे. पण अशा परिस्थितीतही आनंद जपू शकणारे भाग्यवान म्हणावे लागतील. परिस्थितीचा दाह त्यांची प्रसन्नता जाळू शकत नाही. द्रव्याची चणचण अथवा कमतरता त्यांचं हसू झाकोळून टाकू शकतं नाही. आपणही अशा भाग्यवंतांच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न करायला हवा. चला तर, मग आनंदी राहू या, दुसर्‍यांना आनंदी ठेवू या.

जगण्याची शर्यत अधिकाधिक खडतर होत असताना आणि अस्तित्वरक्षणाची लढाई अधिकाधिक हातघाईवर येत असताना आयुष्यातल्या आनंदाचा स्तर खालावणं ओघानंच आलं. त्यात दुष्काळात तेरावा महिना, म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचं वादळ आलं आणि जोरदार वार्यानं झाडोरा विस्कटून जावा त्याप्रमाणे जवळपास प्रत्येकाचं आयुष्य विस्कटून गेलं.

पुढचे काही दिवस तरी अडचणींचा आणि या निमित्तानं उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा गुंता सुटण्याची चिन्हं दिसत नाहीत. पण म्हणून का आपण आनंदाला विन्मुख व्हावं? ‘हरिदूता का विन्मुख व्हावे?’ या काव्यपंक्तींच्या धर्तीवरचा हा प्रश्न स्वत:लाच एकदा विचारुन पहा बरं! उत्तर नक्कीच ‘नाही’ असं असणार. म्हणूनच एकीकडे 20 मार्चच्या जागतिक आनंद दिवस साजरीकरणाविषयीचं वृत्त वाचत असताना आपणही आनंदाभिमुख राहण्याचा संकल्प सोडू या.

असंही प्रत्येकाचं आयुष्य बहुपेडी असतं. सुखाचा एक तर दु:खाचे शंभर या प्रमाणात विणलेल्या या वस्त्रात दु:ख पैशाला पासरीभर मिळणारच! हा तानाबाना विणीतले सगळे रंग आलटून पालटून आपल्यापुढे आणणार. काही रंग उन्हात प्रकर्षानं चकाकणार तर काही सावलीत खुलून दिसणार. त्या प्रत्येकाचा विचार करत बसलं तर संपूर्ण आयुष्य बेरंगी होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच हाती आलेल्या प्रत्येक क्षणावर आनंद पांघरुन आयुष्य आपलंसं करणं आणि मनापासून जगणं हेच जीवनाला निखळतेनं सामोरं जाण्याचं खरं मर्म आहे.

आनंद व्यक्तीसापेक्ष असतो असं म्हणतात ते काही खोटं नाही. काहींची वृत्ती मुळातच आनंदी असते. ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू शकतात. एखादा रत्नपारखी पैलू पाडून साध्याशा रत्नाला झळाळी देतो तद्वत त्यांची आनंदी वृत्ती सामान्य आयुष्यावरही सोनेरी वर्ख चढवून जाते. लौकिकार्थानं मागे राहिलेले हे लोक आनंदाच्या परिमाणात मात्र खूप पुढे निघून गेलेले असतात.

कारण मुळात आनंद कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, आधी उल्लेख केल्याप्रमाणे तो वृत्तीत असावा लागतो. ही वृत्ती असणारा माणूस एखाद्या रसाळ भजनात, एखाद्या चुटक्यात, एखाद्या चारोळीत, गाण्याच्या एखाद्या कडव्यात, रंगाच्या एखाद्या फटकार्यात, गायकाच्या एखाद्या तानेत, वाद्याच्या एखाद्या झंकारात, निसर्गाच्या एखाद्या आविष्कारातही इतका पराकोटीचा आनंद शोधतो की त्याची पारायणं करण्यासाठी परत परत तो अनुभव घेत राहतो आणि पुन्हा तितकाच आनंद मिळवत राहतो. अशा प्रकारे चक्रवाढव्याजाच्या नियमानं त्याच्या आनंदावर आनंदाचं व्याज चढत जातं आणि आनंदाच्या तळ्यात आनंदाचेच तरंग उमटवत त्याचं आयुष्य हळूवार लाटा पसरवत जातं.

आजचं व्यवहारी जग आनंदी दिवस साजरा करताना उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक अहवाल, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या निकषांच्या आधारे एखाद्या देशातले नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात याची पहाणी करुन एका तक्त्यात देशांची नोंदणी करतं. त्याप्रमाणे पहिले पाच देश सर्वात आनंदी तर शेवटचे पाच सर्वात दु:खी असं लेबल लावून एक अहवाल पूर्ण होतो. आश्चर्य म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत समजला जाणारा अमेरिकेसारखा देश या यादीत पहिल्या पाचात दिसत नाही. म्हणजेच आपल्या अध्यात्मात मांडलेला आनंद आणि पैसा यांचा संबंध नसतो, हा विचार इथे सबळतेने स्पष्ट होताना दिसतो. या विचारधारेमुळेच भूतानसारख्या नागरिकांच्या आनंदीपणाचा स्तर महत्त्वाचा मानणार्या आणि त्याच निर्देशांकाच्या आधारे देशाच्या विकासाची व्याख्या आधारभूत मानणार्‍या देशाबद्दल आपल्याला कुतूहल वाटतं. तेव्हा तेच परिमाण प्रमाण मानून आपणही त्यांचा आदर्श पुढे ठेवायला काहीच हरकत नाही.

अनेक विनोदवीरांनी आपल्याला हसायला शिकवलं, आनंद लुटायला शिकवलं आणि दैनंदिन जीवनातल्या व्यथा-विवंचना बाजूला ठेवून भरभरुन कसं जगायचं याचे अनौपचारिक धडे दिले. त्यामुळेच कधी काळी ‘गंभीर’ अशी असणारी मराठी माणसाची ओळख बदलली. आपण सकस आणि कसदार विनोदावर मनसोक्त हसलो. द्वयर्थी शब्दातली गंमत कळल्यावर एकच कल्लोळ केला. अनेक हास्यमहर्षींनी आपल्या स्थितप्रज्ञ आणि चिंताक्रांत चेहर्यावरील जाळ्यात हास्याचे रंग भरले. आपण वक्तृत्वातल्या विनोदावर हसलो, लेखनातल्या कोट्यांवर हसलो, कोपर्‍यातलं व्यंगचित्र पाहून हसलो. शारीरिक आणि वाचिक अभिनय पाहून हसलो. विदुषकाच्या फसव्या आविष्कारावर हसलो तसंच विनोदसम्राटाच्या चेहर्यावरच्या एखाद्या मिश्किल भावावरही हसलो. एकूण काय, तर जगताना समोर येणार्या अडचणींवर मात करताना हास्यामुळे मिळणारे तणावमुक्तीचे क्षण हेच संचित आहे हे आता आपल्याला पुरतं उमगलं आहे. म्हणूनच दु:ख झाकून ठेवण्याच्या प्रयत्नात हसण्याचा गडगडाट दिवसेंदिवस वाढतोय.

हसणं हे आनंदाचं ‘बायप्रोडक्ट’ आहे. आनंदी असलो की ओठांवर आपोआप हळूवार हास्य येतं. म्हणजेच हसणं हा प्रयोग नाही तर निष्कर्ष आहे. हसणं ही मनस्वास्थ्य मिळाल्याची पोचपावती आहे. मिटलेले ओठ विलग होतात तेव्हा मनाचा कुठलासा कोपरा सुखावलेला असतो. कधी त्यामागे कारण असतं तर कधी कारण नसलं तरी या कमळाच्या पाकळ्या आपोआप उमलतात. अर्थातच त्यासाठी मन आनंदी असायला हवं आणि त्यासाठीच दु:खाचं मळभ दूर करण्याचं कसबही जमायला हवं. सुख-दु:ख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा कुठली बाजू सतत समोर ठेवायची हे ठरवणंही गरजेचं आहे. सुखाची अनेक ठाणी आहेत, अनेक झरे आहेत. मनात आणलं तर आपणही त्याखाली भिजू शकतो आणि अवघं आयुष्य सुहास्य वदनानं राहू शकतो.

आनंद आणि निरागस, निखळ आणि निर्मळ हसू कुठल्याही खजिन्यापेक्षा मौल्यवान आहे. कारण कितीही पैसे मोजले तरी ते काही मिळत नाही. आयुष्य पुढे सरकतं तसा अभ्यासाचा ताण वाढतो. मी-तू पणाची जाणीव होते.

सुखाबरोबर दुःख या स्वनिर्मित कल्पनेची ओळख होते. नंतरच्या काळात नियती नावाच्या अदृश्य शक्तीची विविध रूपं वेगवेगळ्या प्रकारे समोर येत जातात आणि परिस्थितीला सामोरं जाताना चेहर्यावरचं हसू आणि मनातला आनंद दुर्मीळ होतो. कपाळावर आट्यांचं आणि मनावर जबाबदारीचं ओझं वाढलं की हसणं, आनंद संकोचतो. देखल्या देवाला दंडवत या उक्तीप्रमाणे हसू येईलही; पण ते कसनुसं वाटतं, उपरं वाटतं. त्यात प्राण नसतो. ती केवळ एक शारीरिक क्रिया होऊन राहते. मुळात कोणत्याही साध्यासुध्या परिस्थितीत दुःख शोधण्याची आणि त्यामुळे व्यथित होण्याची मानसिकता या निखळ आनंदाचा गळा घोटते आणि माणूस अधिकाधिक गंभीर होत जातो. म्हणूनच निखळ आनंद महाग व्हायला जेवढी परिस्थिती कारणीभूत आहे तेवढाच माणूस स्वत:ही.

भौतिक सुखांच्या शोधापायी आणि हव्यासापोटी धावपळ वाढली तेव्हापासून माणसाच्या मनातला आनंद लोप पावायला सुरूवात झाली असं म्हणता येईल. ही सुखं मिळाली की आनंद होतो, नाही असं नाही, पण तो बराच फसवा असतो, अल्पजीवी असतो. कारण सुखाची भूक शमत नाही. लगेचच दुसर्या सुखाची भूक लागते आणि आनंदावर आरूढ होऊन असमाधान त्याला दाबून टाकतं. हे दुष्टचक्र कधीही न संपणारं!

पण अशा परिस्थितीतही आनंद जपू शकणारे भाग्यवान म्हणावे लागतील. परिस्थितीचा दाह त्यांची प्रसन्नता जाळू शकत नाही. द्रव्याची चणचण अथवा कमतरता त्याचं हसू झाकोळून टाकू शकतं नाही. आपणही अशा भाग्यवानांच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न करायला हवा. चला तर, मग आनंदी राहू या, दुसर्यांना आनंदी ठेवू या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *