Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदुर्लक्षित साक्षीदार

दुर्लक्षित साक्षीदार

कळवण । किशोर पगार

साडेतीन शक्तिपीठापैकी एक अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तश्रृंगी निवासींनीच्या वास्तव्यामुळे कळवण तालुक्याला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. परंतु वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे कळवण तालुक्यातील किल्ले आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेले आहे. या किल्ल्याची सुधारणा करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

किल्ले मार्कंडेय थोर तपस्वी मार्कंडेय ऋषींच्या तपप्रवाने हे क्षेत्र पावन झालेले असून मार्कंडेय हा एकेकाळी किल्ला होता. हे अनेक जणांना माहीत नाही इसवी सन 1665 साली मुगल दरबार अली वर्दी खानाने मार्कंडेय किल्ला जिंकून घेतला पुढे वणी दिंडोरीच्या किल्याला महत्त्व प्राप्त होऊन तो शिवाजी महाराजांनी 1670 साली स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. मार्कंडेय डोंगरावर मार्कंडेय ऋषींचे मंदिर असून भाविक नेहमीच दर्शनाला जात येत असतात. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1338 मीटर असून किल्यावर जाण्यासाठी कळवनहून मुळाने बारीमार्गे जाऊन तेथून किल्यावर जाता येते किल्यावर पाण्याचे कुंड आहेत किल्याच्या खुणा पसरल्या असून इथल्या इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

धोडप किल्याचे बांधकाम इसवी सन 1600ते 1625 च्या दरम्यानचे आहे. नाशिक जिल्ह्यापासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूर या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर धोडप किल्ला आहे. ओतूर हे सर्वधर्म समभाव सलोखा असणारे गाव आहे पूर्वेकडे चौरंगनाथ यांची समाधी आहे. जवळच्या डोंगरावर गोरक्षनाथांचे तत्कालीन वास्तव्य व पश्चिमेच्या टोकाला मार्कंडेय ऋषींचा पर्वत असल्याने ओतूर गावापासून वरच्या खोर्‍याचे हे गाव केंद्रबिंदू आहे. पूर्वी ओतूर नगरी ध्रुव राजाची पुण्यपावन नगरी म्हणून ओळखली जायची. ओतूर या गावचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कैलासवासी रा. स. ओतूरकर यांनी आपल्या कलाकृतीचा एक साधारण उत्कृष्ट नजराणा इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीला गवंतांच्या काड्यात अत्यंत कमी वजनाचा रंगीबेरंगी फुलांच्या आकृतीचा हार पाठविला होता. तेव्हा एलिझाबेथ राणीने कैलासवासी रा. स. ओतूरकर यांना अभिनंदनाचा लखोटा पाठविला होता.

1635 मध्ये धोडप किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. इसवी सन 1672 मध्ये छत्रपती शिवरायांनी धोडप स्वराज्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही परंतु पुढे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इसवी सन 1772 मध्ये थोरले माधवराव पेशवे व राघोबादादा यांच्यात संघर्ष झाला. त्या दोघांच्या लढाईत राखोबादादांचा पराभव झाला व त्याच क्षणी धोडप मराठ्यांच्या ताब्यात आला अशी आख्यायिका आहे.

मंदिरे, कबरी, मूर्ती, गुहा, सात लहान मोठी तळे आहे. दर सोमवती अमावास्येला या ठिकाणी यात्रा भरते. लाखों भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात पूर्वी या परिसरात ऋषी तापचर्या करत होते. त्यात मार्कंडेय ऋषींनी स्व सामर्थ्याने सात तळी निर्माण केलेली आहे, अशी दंतकथा प्रचलित आहे. तळ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक हत्यारे, आयुधे व गुप्तधन असल्याच्या कथा आहे. पण त्याबाबत काहीही पुरावे नाही.

धोडप किल्यावर आजही काही साधुसंत तपश्चर्यासाठी येतात. अनेक नाथ पंथातील साधुही येथे अधूनमधून भेटी देत असतात पर्यटक होशीने येथे येत असतात. परंतु पाहिजे त्या प्रमाणात येथे सुविधा नाही.धोडप किल्ला हा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध किल्ला आहे. या ठिकाणचा पर्यटन म्हणून विकास केल्यास परिसरातील युवकांना रोजगार मिळू शकतो. कळवण तालुक्याच्या सीमेलगत एक डोंगराळ रांंग पूर्व व पश्चिम जाते. या रांगाना सातमाळा डोंगर रांग म्हणतात. अतिशय लक्षवेधक अशी ही रांग आहे.

या डोंगर रांगेला अनेक किल्यांचे वैभव लाभलेले आहे मुळातच हे किल्ले प्राचीन आहेत आणि निसर्गामुळे ते एवढे अभेदय आहेत की अगदी इंचभर तटबंदीचे मूठभर सैनिक देखील मोठया शत्रूशी लढतील या पर्वत रांगामध्ये अचला दुसर्‍या क्रमांकाचा किल्ला आहे. अचला किल्यावर सुरुवातीला एक उध्वस्त दरवाजा आहे.

किल्यावर किल्यांची खुणा जपणारी काही प्रमाणात तटबंदी आहे. येथे पुरातन वाड्यांचे आणी घरांचे अवशेष दिसून येतात. किल्यांची उंची समुद्र सपाटीपासून 1155 मीटर 375 फूट आहे. अचला किल्यावर जाण्यासाठी पिंपरी अचला गाव व पिंपरी पाड्यातून जाण्यासाठी।रस्ता आहे. कळवण तालुक्याच्या मातीत घडलेला इतिहास हा इथल्या उज्वल पराक्रमाची साक्ष देतो.

कळवण तालुक्याच्या सरहद्दीलगत हतगड किल्ला आहे. हतगड किल्याचा विकास जिल्ह्याचे माजी पर्यटनमंत्री व विद्यमान मंत्री छगनराव भुजबळ यांनी केलेला आहे. या किल्याचे काम दर्जेदार होण्यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न केले तर निश्चितच हतगड किल्यावर होत असलेला खर्च सत्कारणी लागणार आहे. कळवण परिसरात किल्ला कण्हेरगड, किल्ले खळ्या, जावल्या, धोडप, मार्कंडेय किल्याचे वैभव असतांना देखील पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष आणि शासनाची उदासीनता यामुळे या किल्याची दुरावस्था झालेली आहे.

आजही कळवण तालुक्यातील ऐतिहासिक साक्ष ठरणारे किल्ले उपेक्षित राहिलेले आहे. जर शासनातर्फे या दुर्लक्षित किल्याचा विकास झाला तर इतिहास एकदा ताजा होईल. पर्यटनासाठी चालना मिळेल आणि वैभवशाली इतिहासाच्या स्मृती पुन्हा जाग्या होतील. त्यामुळे इतिहास कळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या