वैद्य तेजश्री मुळे , एम. डी. आयुर्वेद
गेल्या काहीकाळापासून आयुर्वेद चिकित्सेकडे समाज पुन्हा एकदा वळू लागला आहे. आयुष मंत्रालयाने जनसामान्यांत आयुर्वेदाचा प्रसार करणे, त्यासाठी संशोधन आणि उत्तम औषधे निर्माण व्हावीत यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
लोकांचा आयुर्वेदाकडील वाढता कल पाहून औषधी निर्माण उद्योग समूह, एफएमसीजी, कॉर्पोरेट रुग्णालये, विमा कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत.आरोग्य क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अत्याधुनिक साधने उपलब्ध होत आहेत.
‘करोना’सारख्या विषाणूच्या प्रादुर्भावावर तत्काळ औषधे शोधली जात आहेत. त्यावरून वैद्यकीय क्षेत्र किती प्रगत होत आहे याचा अंदाज यावा. ही तत्परता दिसत असताना पाश्चिमात्य देशांत आणि आपल्या देशातही आयुर्वेद, युनानी, योगा थेरपी आदी उपचार पद्धतींना पसंती दिली जात आहे.
या उपचार पद्धतींची मागणीही वाढत आहे. ‘वेलनेस हब’सारखे पर्याय पुढे येत आहेत. निसर्गसंपन्नतेने नटलेल्या परिसरात असे हब उभे राहत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी भागांनाही त्यासाठी पसंती मिळत आहे.
आगामी 25 वर्षांतील बदलत्या औषधोपचार पद्धती आणि त्या अनुषंगाने आयुर्वेदात होणार्या बदलांवर भाष्य करण्यापूर्वी या चिकित्सा पद्धतींची उत्पत्ती ज्या समाजासाठी झाली त्यात होऊ घातलेल्या बदलांचा वेध अवश्य घ्यावा लागेल.
अनादी काळापासून जिज्ञासा, गरज आणि नवी आव्हाने यामुळे तीव्र गतीने तंत्रज्ञानात प्रगती होत आली आहे. अशा अनेक नव्या तंत्रज्ञानाचा आपण अनुभव घेत आहोत, वापर करत आहोत. त्यामुळे निर्माण होणार्या विविध सुविधांचा लाभ आणि निर्माण होणार्या नव्या समस्यांना सामोरे जात आहोत. त्यांची उत्तरे शोधत आहोत.
यातून आपली जिजिविषा (जगण्याची प्रबळ इच्छा) आणि विजिगिषा (जिंकण्याची इच्छा) सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या काहीकाळापासून आयुर्वेद चिकित्सेकडे समाज पुन्हा एकदा वळू लागला आहे.
आयुष मंत्रालयाने जनसामान्यांत आयुर्वेदाचा प्रसार करणे, त्यासाठी संशोधन आणि उत्तम औषधे निर्माण व्हावीत यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. लोकांचा आयुर्वेदाकडील वाढता कल पाहून विविध औषधी निर्माण उद्योग समूह, एफएमसीजी, कॉर्पोरेट रुग्णालये, विमा कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत.
आगामी काळात याची फळे दिसू लागतील. आयुर्वेदाच्या इकोसिस्टिममध्ये वैद्य, रुग्ण, औषध (फार्मा इंडस्ट्री) आणि परिचारक (पॅरामेडिकल इन्फ्रास्टक्चर) या चार घटकांचा समावेश होतो. आगामी काळात माहिती तंत्रज्ञानावर आधारित शोधांमुळे वैद्य आणि रुग्ण यांच्या परस्पर संबंधात आमूलाग्र परिवर्तन झालेले दिसेल. प्रत्यक्ष भेटी कमी होऊन टेलेमेडिसीनचा वापर वाढेल.
अचूक निदान करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले जाईल. रुग्णांची माहिती संकलित करून नवीन उपचार पद्धती विकसित केल्या जातील. अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतीत सुधारणा करण्यात येतील. औषधे निर्माण प्रकियेतदेखील नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेली औषधे, औषध प्रमाणिकरणाच्या अधिक अचूक पद्धती, त्यांची साठवणूक यात नवीन प्रक्रिया समाविष्ट करण्यात येतील.
नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्त:।
दाता समः सत्यपरः क्षमावान् आप्तोपसेवी च भवति अरोगः॥