प्रणवदांचे वेगळेपण

प्रणवदांचे वेगळेपण

लेख - रशिद किडवई , ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक

बदलत्या काळाचा विचार करून शांतपणे निर्णय घेणारा नेता ही प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत होती. कायदा, इतिहास, अर्थ आदी अनेक विषयांमध्ये त्यांना प्रचंड ज्ञान असल्यामुळे त्यांनी अनेक मंत्रिपदांची जबाबदारी सहजपणे हाताळली. इंदिरा गांधी यांचा मुखर्जी यांच्यावर एवढा विश्‍वास होता, की

बर्‍याच वेळा महत्त्वाची जबाबदारी त्या मुखर्जी यांच्यावर सोपवीत असत. एखाद्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाचे मतैक्य अत्यंत सहजगत्या घडवून आणून ते पंतप्रधानांना किती मदत करीत असत, हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना निश्‍चित आठवत असेल.

भारतरत्न आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज अखेर संपली आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एका अभ्यासू आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली आहे. राजकारणाचा विचार करता, मुखर्जी यांनी इंदिरा गांधींच्या कार्यकाळापासून मनमोहनसिंगांच्या कार्यकाळापर्यंत अनेकदा संकटमोचक म्हणूनच जबाबदारी पार पाडली. 1982 मध्ये बॅ. ए. आर. अंतुले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, त्यावेळीही संपूर्ण घटनाक्रमात प्रणब मुखर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आंध्र आणि अन्य अनेक अशी राज्ये होती, जिथे मुख्यमंत्री सतत बदलले जात होते. अशा राज्यांत इंदिरा गांधी यांचे प्रमुख दूत म्हणूनच मुखर्जी यांनी भूमिका बजावली.कोलकता येथे 1963 मध्ये पोस्ट आणि तार खात्यातील डेप्युटी अकौंटंट जनरलच्या कार्यालयात अप्पर डिव्हिजन क्लार्क म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. तेथपासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. राज्यशास्त्र आणि इतिहास घेऊन एम. ए. झाल्यानंतर त्यांनी एल. एल. बी. ची पदवी संपादन केली आणि त्यांना राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून विद्यानगर कॉलेजमधून बोलावणे आले.

मुखर्जी यांनी ‘देशेर दाक’ (मातृभूमीची हाक) नावाच्या नियतकालिकात काही काळ पत्रकारिता केली आहे, हे ङ्गारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्यांची राजकीय कारकीर्द 1960 च्या दशकात, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुरू झाली. राज्यसभेचे तिकीट देऊन इंदिरा गांधींनी मुखर्जी यांना दिल्लीत आणले. 1977-78 मध्ये जेव्हा काँग्रेसच्या बर्‍याच मोठ्या नेत्यांनी इंदिरा गांधींची साथ सोडली होती, तेव्हा मुखर्जी इंदिरा गांधींसमवेत राहिले. एवढेच नव्हे तर मूठभर पक्ष पदाधिकार्‍यांनी नवी दिल्ली येथील 24, अकबर रोड येथे सुरू केलेल्या इंदिरा काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात खजिनदार म्हणून कामही केले. इंदिरा गांधी आणि त्यांचा पक्ष या दोहोंसाठी हा कसोटीचा काळ होता. इंदिरा गांधी स्वतः त्या काळात ‘बेघर’ होत्या.

1980 मध्ये इंदिरा गांधींचे जोशात पुनरागमन झाले तेव्हा मुखर्जी यांनी त्यांच्यासाठी प्रमुख संकटमोचक म्हणून कामगिरी पार पाडली होती. 1984 मध्ये ‘युरोमनी’ नियतकालिकातर्ङ्गे मुखर्जी यांना जगातील पाच सर्वोत्कृष्ट अर्थमंत्र्यांच्या यादीत स्थान देण्यात आले. इंदिरा गांधी यांचा मुखर्जी यांच्यावर एवढा विश्‍वास होता, की बर्‍याच वेळा आर. व्यंकटरामन, पी. व्ही. नरसिंहराव आणि एन. डी. तिवारी या तीन ज्येष्ठ मंत्र्यांप्रमाणेच महत्त्वाची जबाबदारी त्या मुखर्जी यांच्यावर सोपवीत असत.

एखाद्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाचे मतैक्य अत्यंत सहजगत्या घडवून आणून ते पंतप्रधानांना किती मदत करीत असत, हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना निश्‍चित आठवत असेल. कायदा, इतिहास, अर्थ आदी अनेक विषयांमध्ये त्यांना प्रचंड ज्ञान असल्यामुळे त्यांनी अनेक मंत्रिपदांची जबाबदारी सहजपणे हाताळली. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात सुमारे डझनभर मंत्रिगटांचे आणि समित्यांचे नेतृत्व मुखर्जी यांच्याकडे होते.

साधारणपणे 2001 च्या सुरुवातीच्या दिवसांत प्रणब मुखर्जी यांनी एक मुलाखत दिली होती. आपण या देशाचे पंतप्रधान कधीच का बनू शकलो नाही, याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. त्यावेळी राज्यसभेचे सदस्य असणार्‍या मुखर्जींनी यासाठी तीन कारणे दिली होती. पहिले कारण म्हणजे, हिंदीवर प्रभुत्व नसणे. दुसरे कारण म्हणजे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, ज्योती बसू, राजीव गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेतृत्वगुणांचा अभाव आणि तिसरे कारण म्हणजे, लोकसभा निवडणूक जिंकण्यात आलेले अपयश. (त्यानंतर 2004 मध्ये प्रणब मुखर्जी यांनी लोकसभेची निवडणूक प्रथमच जिंकली. अर्थात, ही मुलाखत प्रकाशित होईपर्यंत नरेंद्र मोदी यांचा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणूनही उदय झालेला नव्हता, म्हणून वरील यादीत मोदींच्या नावाचा समावेश दिसत नाही.) याच मुलाखतीत स्वतःच्या अंगी असलेल्या अन्य गुणांसंदर्भात विचारले असता, मुखर्जी यांनी भारतीय राजकारणाचा अभ्यासक या नात्याने एके दिवशी भारताचा राष्ट्रपती बनण्याचे आपले स्वप्न आहे, असे सांगितले होते.

तो दिवस जुलै 2012 मध्ये उजाडला आणि सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतिपदासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. मुखर्जी यांच्या पाच दशकांच्या प्रदीर्घ सेवेचे ङ्गळ म्हणून त्यांचा राष्ट्रपती भवनाचा मार्ग खुला झाला होता. सोनियांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, 2007 मध्ये त्यांनी प्रणब मुखर्जी यांना आपण राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर करण्याची विनंती केली होती; मात्र 2012 मध्ये त्यांनी मुखर्जी यांच्या निष्ठेची, राजकीय कारकीर्दीची तसेच देशाच्या आणि पक्षाच्या सेवेची दखल घेऊन त्यांना संधी दिली.परंतु मुखर्जी कदाचित हे भारताला कधीच न लाभलेले चांगले पंतप्रधान होते, असे म्हणता येईल.

अनेक दशकांच्या राजकीय जीवनात प्रणब मुखर्जी यांच्या गांधी कुटुंबीयांपैकी काही व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये अनेक चढउतार आले. संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यासाठी ते नेहमीच विश्‍वासातील व्यक्ती होते. राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या बाबतीत मात्र त्यांच्या संबंधात बरेच चढउतार आले. ‘द टर्ब्युलंट इयर्स (1980-1996)’ हा त्यांच्या आत्मकथनाचा दुसरा भाग रूपा पब्लिकेशनने प्रकाशित केला असून, त्यात त्यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील त्यांचे संबंध कसे औपचारिक स्वरूपाचे होते आणि त्याउलट इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी त्यांचे संबंध कसे खुले होते, याचे वर्णन केले आहे. राजीव गांधी यांच्याबद्दल ते नेहमी तोलूनमापून आणि मोजकेच बोलत. ‘‘संपूर्णपणे परिपक्व कुणीच नसतो, हे खरे आहे.

काही सल्लागारांवर आणि मित्रांवर अतिरिक्त विश्‍वास असल्याबद्दल राजीव गांधी यांच्यावर नेहमी टीका केली जाते. त्यांनी ‘बाबालोग सरकार’ स्थापन केल्याचे बोलले जाते,’’ असे त्यांनी म्हटले होते. एप्रिल 1986 मध्ये राजीव गांधी यांनी प्रणब मुखर्जी यांना पक्षातून निलंबित केले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठी आणि वसंतदादा पाटील या दोघांनी याबद्दल राजीव गांधींना विरोध दर्शविला होता. 1988 मध्ये मुखर्जी यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.

राजीव गांधी यांच्याशी मुखर्जी यांचे अत्यंत मर्यादित संबंध असल्यामुळेच कदाचित सोनिया गांधींनी नंतरच्या काळात देशाच्या गृहमंत्रिपदासाठी किंवा पंतप्रधानपदासाठी मुखर्जी यांच्या नावाचा कधी विचार केला नसावा, असे मानले जाते. परंतु ‘10, जनपथ’च्या निकटवर्तीयांच्या मते सोनिया गांधी यांनी मुखर्जी यांच्या योगदानाचा नेहमीच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. 1998 मध्ये जेव्हा सोनियांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, त्यावेळी पी. व्ही. नरसिंहराव यांनी घटना आढावा समितीपुढे म्हणणे सादर केले होते हे कळल्यावर त्या प्रचंड नाराज झाल्या. न्या. एम. एन. व्यंकटचलय्या यांच्या नेतृत्वाखाली अटलबिहारी वाजपेयी यांनी या समितीची नियुक्ती केली होती आणि त्या काळातील सोनियांचे प्रखर विरोधक पी. ए. संगमा यांचा त्या समितीत समावेश होता.

भीतीपोटी काँग्रेसने समितीच्या बैठकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. नरसिंहराव यांनी या समितीसमोर म्हणणे सादर केल्याचे कळताच सोनिया अस्वस्थ झाल्या होत्या. परंतु तरीही राव यांच्या विरोधात कोणतेही विधान न करता त्यांनी मुखर्जी यांना राव यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पाठविले. राव यांनी मुखर्जी यांना सांगितले की त्यांनी कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही. सिक्कीमसंदर्भात इंदिरा गांधी यांच्याबाबत असलेले गैरसमज दूर झाले असल्याचे आपण समितीला सांगितले होते, असे राव यांनी मुखर्जी यांच्यासमोर स्पष्ट केले. सिक्कीमचा भारतीय राज्य म्हणून अंतर्भाव करताना घटनात्मक अडचणी आल्यामुळे घबराट उडाली होती आणि त्या बाबतीत इंदिरा गांधी यांच्या धोरणाविषयी आपला गैरसमज झाला होता, असे राव यांनी समितीला सांगितले होते. हे समजल्यावर सोनियांनी लागलीच राव यांना क्लीन चिट दिली. आपल्याला राव यांच्याविषयी आतीव आदर असून, आपल्या सासूबाईंनाही (इंदिरा गांधी) राव यांच्याविषयी प्रचंड आदर होता, असे सोनियांनी त्यावेळी म्हटले होते.

बदलत्या काळाचा विचार करून शांतपणे निर्णय घेणारा नेता ही मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत. जुन्या काळातील नेते मुखर्जी यांना नियमांचा पक्का असलेला राजकारणी म्हणून ओळखतात. 1980 च्या दशकात सुरुवातीला ते अर्थमंत्री होते आणि इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील क्रमांक 2 चे नेते म्हणून मान्यता पावले होते. एस-22, ग्रेटर कैलाश या खासगी निवासस्थानीच ते त्यावेळी राहत असत. त्यांची मोटार सावित्री सिनेमागृहाजवळ येताच ते चालकाला हॉर्न न वाजविण्याची सूचना देत. आपले शेजारी त्यामुळे विचलित होतील, असे त्यांना वाटत असे. त्यानंतर मुखर्जी यांनी 2 जंतरमंतर लेन येथे वास्तव्य केले. 6 रायसिना रोड या अटलबिहारी वाजपेयींच्या निवासस्थानानजीक हा बंगला होता. टोकाचे वैचारिक मतभेद असतानासुद्धा रात्रीच्या जेवणानंतर ते नेहमी वाजपेयींशी गप्पा मारीत असत. वाजपेयींची मानसकन्या नम्रता याही मुखर्जी यांच्याकडून नेहमी ‘बंगाली अचार’ आणत असे. असे सर्वसमावेशक, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रणब मुखर्जी होत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com